रानभाज्या खा... अन रोगप्रतिकार शक्ती वाढवा मान्यवरांचे आवाहन; रानभाजी महोत्सवाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 9, 2020

रानभाज्या खा... अन रोगप्रतिकार शक्ती वाढवा मान्यवरांचे आवाहन; रानभाजी महोत्सवाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 रानभाज्या खा... अन रोगप्रतिकार शक्ती वाढवा
मान्यवरांचे आवाहनरानभाजी महोत्सवाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


सोलापूर,दि.9(क.वृ.)माहिती असलेल्या पालेभाज्या.. फळभाज्या आपण खातो...पण बांबूच्या कोवळ्या पानांची...सराटा...केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी या रानभाज्यांचीही भाजी होते, हे माहिती नसते. रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. याचा रोजच्या आहारात वापर करण्याचे आवाहन रानभाजी महोत्सवात मान्यवरांनी केले.

निमित्त होते नेहरूनगर शासकीय मैदानात राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मातर्फे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे. यावेळी आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर राजेश काळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अमृत सागर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

नवीन पिढीला रानभाज्या समजाव्यात, त्यांचे आरोग्यातील महत्व समजावे यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार आजच्या ऑगस्ट क्रांती आणि जागतिक आदिवासी दिनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

श्री. बिराजदार यांनी कोरोनाच्या काळात रानभाज्यांचे महत्व पटवून दिले. महोत्सव आयोजनाबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये सोलापूर शहरात नागरिकांना भाजीपाला कमी पडू दिला नाही. रानभाजीला आयुर्वेदिक महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. देशमुख यांनी रानभाज्या महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. हा स्तुत्य उपक्रम असून कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. रानभाज्यासाठी सोलापूर ब्रँड व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. शंभरकर म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. जिल्ह्यातील कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे. या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून भाज्या खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. दिवाणजी म्हणाले, फास्टफूडच्या जमान्यात युवा पिढीला रानभाज्यांचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. आरोग्यासाठी रानभाज्या खाणे महत्वाचे आहे.

यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. तसेच रानभाजी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाला अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शिवकुमार सदाफुले, शहाजी पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  

या महोत्सवात चुका भाजी, अंबाडी, गुळवेल, चिघळ, शेवगा पाला, उंबर, पाथरी, कडवंची, तांदुळजा, हादगा, आघाडा, अळू, इचका, टाकळा, चंदन बटवा, करडई आणि कुरडू या रानभाज्या विक्रीसाठी आहेत. रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले उपयोग याची सचित्र माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages