राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा
चेतनसिंह केदार-सावंत यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सांगोला दि.२५(क.वृ.): कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत मात्र, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून, पालकांची परिस्थिती हालाकीची व अडचणीची झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनामुळे गत चार महिन्यापासून देश लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना संकटामुळे अनेक कुटुंबे बेरोजगार झाले आहेत. अशा स्थितीत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून, पालकांची परिस्थिती हालाकीची व अडचणीची झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र शासना सोबत महाराष्ट्र शासनाने देखील युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या वर्गातील कुटुंबांची परवड सुरु झाली आहे. उद्योग, लहान-मोठे व्यवसाय पूर्णत: बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात होत असलेल्या आर्थिक कोंडीमुळे कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना आता काही महिने जावे लागतील.
चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. मात्र काही शाळांनी पालकांकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. गरीब कुटुंबांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरणेही कठीण होणार आहे. या त्रासापासून सर्वच कुटुंबांना दिलासा देण्यासाठी खाजगी अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित अशा सर्व शाळांचे आणि पदवीपर्यंतच्या सर्व शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क पूर्णत: माफ करण्याचे आदेश सबंधित सर्व खाजगी शाळा-महाविद्यालयीन संस्थाचालक आणि व्यवस्थापनाला देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येऊन तसे आदेश त्वरीत संबंधितांना देण्याची मागणी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. सदर निवेदनाच्या प्रति शालेय शिक्षणमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पाठवल्या आहेत.
तहसीलदार योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जि.प.सदस्य अतुल पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, नगरसेवक आनंदा माने, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य अमरसिंह शेंडे, माढा तालुका सरचिटणीस योगेश बोबडे, गिरीश ताबे, आनंद फाटे, दत्ता टापरे, डॉ. मानस कमलापूरकर, उमेश मंडले आदी उपस्थित होते.
सांगोला तालुक्यात यंदा विक्रमी क्षेत्रावर खरीप हंगामात पेरण्या झाल्या असून शेतकऱ्यांना खत टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषी सेवा केंद्रात खतांसाठी शेतकऱ्यांना आवश्यक तेवढा दिला जात नाही. कमी प्रमाणात युरिया खत उपलब्ध असल्याने कोरोनाच्या संकटकाळात जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून खत खरेदी करावे लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून द्यावीत यासाठी भाजपच्या वतीने मंगळवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सांगोला तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
0 Comments