दादागिरी करून बंद करायला लावणे हे चालणार नाही- जयसिंह मोहिते-पाटील
अकलूज (प्रतिनिधी) ( विलास गायकवाड) अकलूज मध्ये अडीच हजार गाळे आहेत. दोन हजार व्यापारी आहेत, दहा हजार परिवाराचा उदरनिर्वाह व्यवसायावर अवलंबून आहे. दादागिरी करून गाव बंद ठेवायचा विचार केला तर हे चालणार नाही त्याला आमची ताकद दाखवून देवू असे प्रतिपादन शांतता व समन्वय समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सतत होणारे गाव बंद यामुळे सर्वसामान्यांना आणि दुकानदार व्यावसायिकांना होणारा त्रास यावर कायमचा तोडगा काढण्यासंदर्भात अकलुज ग्रामपंचायत येथे शांतता व समन्वय समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, अकलुज ग्रामपंचायतीचे सरपंच व शांतता समन्वय समितीचे कार्याध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, डीवायएसपी राजगुरू ,पोलीस निरीक्षक निंबाळकर, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील उपसरपंच धनंजय देशमुख सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयसिंह मोहिते पाटील बोलत होते. यावेळी अकलूज परिसरातील सर्व लहान-मोठे व्यापारी व्यावसायिक सर्व असोसिएशन विविध मंडळे भाजीपाला विक्रेते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले बंद कमी करायचा असेल तर गावाने एकमुखी राहिले पाहिजे शांतता समितीचे सदस्य झाल्यानंतर शंभर टक्के हमी आपण घेऊ असे म्हणाले. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले ज्यांनी सोशल मीडियावर गाव बंद पोस्ट व्हायरल केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व व्यापारी वर्गांच्या सह्या घ्याव्यात हा निर्णय गावाचा आहे वैयक्तिक कोणाचा नाही, तर बंदच्या एक दिवस आगोदर गाव बंदला विरोध म्हणून अकलूज पोलीस स्टेशन वरती मार्च काढण्यात यावा अशी सूचना त्यांनी मांडताच सर्व गावकऱ्यांनी एक मुखाने संमती दर्शवली. डीवायएसपी राजगुरू म्हणाले पहिली धमक तुमच्यात असली पाहिजे धंदा व्यवसाय तुमचा आहे बंद ठेवायची गरज नाही एखादा कोणी बंद ठेवण्यासाठी सांगेल त्याचे नाव सही घ्या त्याचा बंदोबस्त करू पोलीस तुमच्यासोबत आहे. यावेळी प्रास्ताविकामध्ये अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच व शांतता समन्वय समितीचे कार्याध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले या अगोदर आपण एखादी घटना घडली तर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बंद पाळून निषेध व्यक्त करीत होतो गेल्या आठवड्यात बंद साठी शांतता समितीकडे मागणी प्रस्ताव नसतानाही गाव बंद ठेवण्यात आले यापुढे बंद होऊ नये आणि झाला तर सर्वांच्या विचाराने ठेवावा असे ते म्हणाले यावेळी विविध प्रकारचे व्यापार व्यवसायिक यांचे प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:
Post a Comment