माळशिरस तालुक्यात मंडलनिहाय महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिरे
अकलूज(प्रतिनिधी)सर्व शासकीय सुविधांचा निपटारा करण्यासाठी माळशिरस तालुक्यात मंडलनिहाय महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार ,आहेत. तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पिक विमा आदी समस्यांवर चर्चा करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत समाधान शिबीर संदर्भातील धोरण ठरले .केळी पिकाचा फळबाग म्हणून समाविष्ट व्हावा व तालुक्यातील अतिशोषीत गावावरील बंदी उठवावी यासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. माळशिरस तालुक्यात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत ७ कोटी२१ लाखांची मदत वाटप करण्यात आली असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले. त्याशिवाय पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ कोटी ६९ लाख वाटल्याचे तहसीलदारांनी सांगितले. पिक विमा मिळण्यासंदर्भात शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होते याकडे माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, महसूल कृषी आणि जलसंपदा या खात्यांच्या सर्वेक्षणानुसार विमा कंपन्या पिक विम्याचे धोरण ठरवतात. या सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्रितरीत्या सर्वेक्षण करून अहवाल सादर केला तर पिक विमा मिळणे सोपे होईल. यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत .तालुका स्तरावरील विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना दाद देत नसल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या. केळी व पपई या पिकाचा समावेश फळपीक म्हणून होत नाही. त्यामुळे फळबाग योजनेचा लाभ केळी ,पपई बागायतदारांना मिळत नाही यासाठी शासन पातळीवरील धोरण बदलण्याची संदर्भात पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरले. सर्व शासकीय योजना लाभार्थ्यांना गावपातळीवर मिळवून देण्यासाठी तालुक्यात मंडल निहाय समाधान शिबिरे आयोजित करण्याचे धोरण या बैठकीत ठरले. यासंदर्भातील एक प्रमुख शिबीर माळशिरस येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. या शिबिरामध्ये प्रशासकीय स्तरावरील १९ खात्यांचे अधिकारी उपस्थित राहून सर्व प्रकारचे दाखले ,शिधापत्रिका व सर्वच योजना नागरिकांना मिळवून देणार आहेत. या बैठकीस उपसभापती अर्जुनसिंह मोहिते, प्रांताधिकारी शमा पवार,तहसीलदार अभिजीत पाटील, तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे, जलसंपदा खात्याचे उपअभियंता अमोल मसकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एन. एच. चव्हाण ,मंडल कृषी अधिकारी डी. एस. गायकवाड, सहकार महर्षी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले आदी उपस्थित होते .यानंतर अकलूज हद्दीतील गांधी चौक येथील एक किलोमीटर लांबीच्या ओढ्यातील व प्रतापसिंह चौक येथील दीड किलोमीटर लांबीच्या ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते किशोरसिंह माने पाटील, प्रांताधिकारी शमा पवार ,तहसीलदार अभिजीत पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. अति पाणी उपशामुळे माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील ३६ गावे अतिशोषीत गावे म्हणून निर्बंधित करण्यात आली आहेत. यंदा चांगला पाऊस पडल्याने या गावांमधील पाणीपातळी पूर्ववत झाली आहे. त्यामुळे या गावांवरील ही बंदी उठवण्यास संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले. ऊस शेतीसाठी ठिबक सिंचन यंत्रणा सक्तीची करण्याचे धोरण लवकरच येणार आहे. त्यासंदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले.सोलापूर जिल्ह्यात रब्बीची पिके मोठ्या प्रमाणात होत असतानाही शासकीय पातळीवर हा जिल्हा खरीपाचा जिल्हा म्हणून नोंद होती. ती आता बदलण्यात आली असून आता रब्बीचा जिल्हा म्हणून सोलापूरवर मोहर लागली आहे. त्यामुळे रब्बीतील बाधित पिकांना मदत मिळण्यासाठी त्याचा मोठा लाभ होणार आहे. शासकीय पातळीवर हा बदल झाल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकरीवर्गासही मोठा दिलासा मिळणार आहे. शमा पवार, प्रांताधिकारी ,अकलूज
0 Comments