तणावावर मात करण्यासाठी खेळाचा आधार घ्यावा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील
सोलापूर, दि.21 - खेळ दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवेत. महसूल कर्मचारी अधिकारी यांनी दैनंदिन तणावावर मात करण्यासाठी खेळाचा आधार घ्यायला हवा, असे आवाहन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे केले. सिंहगड
इन्स्टिटयूटच्या मैदानावर आज महसूल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, दीपकआबा साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य बळीरामकाका साठे, उमेश पाटील, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,गोपीचंद कदम आदी उपस्थित होते. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, ‘महसूल विभाग राज्य
शासनाचा अभिनय महत्वाचा विभाग आहे. राज्य शासनाच्या प्रशासनाचा कणा आहे. अलिकडे महसूल विभागाला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करताना ताण देणे साहजिकच आहे. या ताणावर मात करण्यासाठी खेळाचा आधार घ्यायला हवा. खेळामुळे ताण तणाव कमी तर होतोच. त्याच बरोबर शारिरीक तंदुरूस्ती राहते. तंदुरूस्ती असेल तर कार्यक्षमता वाढते. त्याचा कामाचा निपटारा होण्यास मदत होते’. वळसे पाटील म्हणाले, प्रगत देशातील
नागरिकांच्या जीवनात
खेळाला अतिशय महत्व असते. त्यामुळे ते शारीरीक दृष्ट्या तंदुरुस्त असतात. त्यामुळे त्यांच्यातील कार्यक्षमताही जास्त असते.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रास्ताविक केले तर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आभार मानले. तत्पुर्वी, सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर आणि पुणे संघाच्या पथकांनी शानदार संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी खेळाडूंना खिलाडूवृत्तीची शपथ दिली. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्याात आला तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस बार्शी –सोलापूर रस्त्यावरील अपघातात आज मरण पावलेल्या बार्शी पंचायत समितीकडील उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
0 Comments