मंत्रिपद नको असताना
आग्रह; आता मागूनही मिळत नाही-आ.बबन शिंदे
यापूर्वी १९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात शिवसेनेने
मंत्रिपदाची संधी देऊ केली असता आपण नाकारली होती. तद्पश्चात आता विधानसभेवर सलग
सहाव्यांदा निवडून आल्यानंतर मागितले तरीही मंत्रिपद मिळत नाही, अशा शब्दात माढय़ाचे
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आ. बबनराव शिंदे यांनी खंत व्यक्त केली. मात्र मंत्रिपद
हे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ नाही,
अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त
केली. माढा येथे दिवंगत पत्रकार शाहजहान शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने
देण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार आ. शिंदे यांना प्रदान समारंभपूर्वक करण्यात
आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आ. अॅड. धनाजी साठे, विनायकराव पाटील, लेखक प्रा. डॉ.
राजेंद्र दास आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ. शिंदे म्हणाले, १९९५ साली आपण
सर्वप्रथम माढा विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलो, तेव्हा राज्यात
सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीला आपण पाठिंबा दिला होता. त्या वेळी युतीने
आपणांस मंत्रिपदाची संधी देऊ केली होती. परंतु आपण मंत्रिपदाऐवजी माढा मतदार
संघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. त्यानुसार
युती सरकारने माढा तालुक्याचा कायापालट करणाऱ्या सीना-माढा उपसा सिंचन योजना व
अन्य महत्त्वाकांक्षी योजनांसाठी भरीव निधी दिला. त्यातून पाण्याचा प्रश्न निकाली
लागून माढय़ाचे भाग्य उजळले. याच विकासाच्या भांडवलावर आपण मतदारांची विश्वासार्हता
कायम राखली आणि त्याच बळावर सलग सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आलो. २५-३० वर्षे
विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत असताना यंदा राज्यातील महाविकास आघाडीच्या
सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी आपणांस खात्री होती. परंतु मागणी करूनही मंत्रिपद नाकारले गेले, अशी खंत त्यांनी
व्यक्त केली. मात्र त्यावर लगेचच सावरून घेताना मंत्रिपद हेच सर्वश्रेष्ठ नसते, तशी भावना आपण
कधीही बाळगत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
0 Comments