स्वातंत्र्यदिनी करमाळ्यात आमरण उपोषण सुरू; ऊस पिकाच्या नुकसानीप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय व लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
करमाळा (कटूसत्य वृत्त):- निमगाव (ह.), ता. करमाळा येथील दलित शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फडात ट्रॅक्टर घालून नुकसान करणाऱ्या अप्पा वासुदेव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मंडल अधिकारी अमितकुमार कलाटेवाड यांच्यावर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बहुजन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ वाघमारे यांनी स्वातंत्र्य दिनापासून करमाळा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मौजे निमगाव (ह.), ता. करमाळा येथील गट क्रमांक ११९/२अ/१ मधील शेताच्या बांधाच्या हद्दीच्या खुणा कायम करण्याचा आदेश देणे, तसेच संबंधित प्रकरणाची पुढील तारीख वाढवून देण्यासाठी सालसे मंडल कार्यालयाचे मंडल अधिकारी अमितकुमार कलाटेवाड यांनी उपोषणकर्त्यांकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, निमगाव (ह.) येथील गट क्रमांक ११९/२अ/१ मधून बांधावरून रस्ता करण्याचा आदेश असतानाही दलित समाजातील शेतकऱ्यांच्या शेतातील अर्धा ते पाऊण एकर ऊस पिकात अप्पा वासुदेव शिंदे यांनी साथीदारांसह ट्रॅक्टर घालून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार जातीवादी मानसिकतेतून घडल्याचा दावा करत संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायदा आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा नागनाथ वाघमारे यांनी दिला.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र संघटक संजय कदम, मातंग एकता आंदोलनाचे तालुकाध्यक्ष शरद पवार, मारुती विनायक नीळ, देवा खताळ, बाळू पवार, रावसाहेब देवराव नीळ पाटील, संजय कुंभार, आदिनाथ जगताप, गणेश जगताप, अरुण जगताप, राम जगताप, बाबा करंडे (सर्व रा. निमगाव ह.), तसेच अभिजित मंडलिक, विश्वजीत मंडलिक, बाळासाहेब आतार (करमाळा), बाळासाहेब पवार (सरपंच, फिसरे), राजेंद्र रामचंद्र शिंगण यांच्यासह बहुजन संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment