‘मास लॉ असोसिएट्स’चा प्रथम वर्धापन दिनानिमित्त ‘विधिमित्र पुरस्कार’ सोहळा
मास लॉ असोसिएट्सची स्थापना १५ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली. “Justice is the sum of all moral duty.” हे ब्रीदवाक्य स्वीकारून संस्था न्याय, सामाजिक बांधिलकी आणि कायदेविषयक जनजागृतीच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.
समाजाभिमुख उपक्रमांचा वर्षभराचा प्रवास
गेल्या वर्षभरात मास लॉ असोसिएट्सच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मोफत विधी साक्षरता शिबिरे, मोफत कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे, मोफत कौटुंबिक समुपदेशन तसेच शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक प्रशिक्षण यांचा समावेश आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती करून देणे आणि न्यायप्रक्रियेबाबत त्यांना सक्षम करणे, हा संस्थेच्या या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे.
विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा ‘विधिमित्र पुरस्काराने’ सन्मान
समाजात न्याय, सत्य, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या योगदानाचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने यंदा ‘विधिमित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास, सोलापूर शहराचे मा. पोलिस आयुक्त, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीनिवास क्यातम, डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात येणार असून, सोलापूर बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नूतन उत्तीर्ण न्यायाधीश मा.विजय कोंडा आणि पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठात एल.एल.एम. च्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावलेले अमर जिंदम यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
न्याय आणि सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेण्याचा संकल्प मास लॉ असोसिएट्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, न्यायव्यवस्था, सामाजिक सेवा, शिक्षण, प्रसारमाध्यमे आणि श्रमक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सार्वजनिक गौरव करण्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा वसा अधिक व्यापक करण्याचा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
15 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे जवळ टेक्सटाइल डेव्हलपमेंट फाऊंडेशन हॉल येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास विधीज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस मास लॉ असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. मोहन कुरापाटी, ॲड. अनिल वासम, ॲड. धनंजय वांझरे, ॲड. शाम आडम आदींची उपस्थिती होती.
चौकट-
पुरस्कारार्थी मान्यवर पुढीलप्रमाणे :
१. विधिमित्र श्रमप्रतिष्ठा पुरस्कार
देवीदास घोडके — शिपाई, वालचंद महाविद्यालय
२. विधिमित्र सामाजिक सेवा पुरस्कार
आतिश शिरसट — संभव फाउंडेशन
३. विधिमित्र विधी सेवा पुरस्कार
ॲड. आझमुद्दीन शेख — जिल्हा व सत्र न्यायालय
ॲड. गीताराणी घनाते — जिल्हा व सत्र न्यायालय
४. विधिमित्र शैक्षणिक सेवा पुरस्कार
श्रीनिवास — चेअरमन, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला
५. विधिमित्र प्रसारमाध्यम सेवा पुरस्कार
आफताब शेख — ABP माझा
हरिश्चंद्र कदम — दैनिक संचार



No comments:
Post a Comment