पायी निघालेल्या साबळे पाटील यांना पोलिसांकडून ताब्यात; समर्थकांचा दडपशाहीचा आरोप
पोलीसांनी कोणाच्या तरी ताटा खालचं मांजर होवू नये...
धाराशिव (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे पायी निघालेले सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, समर्थकांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत दडपशाहीचा आरोप केला आहे.
दिल्लीतील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि भाजपच्या पिलावळींने
पेपरफुटी केल्याच्या निषेधार्थ रविराज साबळे पाटील मुंबईच्या दिशेने पायी निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना बेकायदेशीर अडवत ताब्यात घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. यावेळी "माझं ऐकून तर घ्या" अशी विनंती ते वारंवार करत असतानाही पोलिसांनी त्यांना वाहनात बळजबरीने कोंबल्याचे दिसून येत आहे.
या घटनेनंतर समर्थकांनी पोलिस प्रशासनावर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीशी अशा प्रकारे वागणे अयोग्य असून, ही कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
समर्थकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पेपरफुटीविरोधातील आंदोलन कमकुवत करण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली. "गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी न्यायासाठी लढणाऱ्यांनाच ताब्यात घेतले जात आहे," अशी टीकाही करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यामागील कारणाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली, याबाबत स्पष्टता आलेली नाही.
या घटनेमुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्था, आंदोलनाचा अधिकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे. संबंधित घटनेबाबत पोलिस प्रशासनांनी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे नाही तर सुजाण नागरिक म्हणतील, "पोलीस हे कोणाच्या तरी ताटा खालचं मांजर आहेत."

No comments:
Post a Comment