म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले; मंगळवेढा तालुक्याला मोठा दिलासा
आ. समाधान आवताडे यांच्या मागणीला यश; दक्षिण भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : कृष्णा व पंचगंगा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या कालव्यात सोडण्याची आमदार समाधान आवताडे यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मान्य केली आहे. त्यानुसार म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले असून, यामुळे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप पेरणी खोळंबली आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे कृष्णा आणि पंचगंगा नदीतून अतिरिक्त पाणी वाहून जात असल्याची बाब आमदार आवताडे यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली.
हे अतिरिक्त पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक १ व २ तसेच उमदी वितरिकेलगतच्या गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत सरकारने आवश्यक आदेश दिल्यानंतर म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता मासाळ यांनी दिली.
या निर्णयामुळे मंगळवेढा तालुक्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून, शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामालाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर तालुक्यालाही निरेच्या पाण्याचा लाभ
आमदार समाधान आवताडे यांनी यापूर्वी शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठ्याची मागणी यशस्वीपणे मार्गी लावली होती. त्यानंतर त्यांनी निरा नदीवरील वीर धरण भरल्यानंतर कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्याला पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने निरा कालवे सुरू करण्यात आले असून, पावसाअभावी अडचणीत आलेल्या पंढरपूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतांना आता सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment