मैंदर्गी अतिउच्चदाब उपकेंद्राला तत्त्वतः मंजुरी; ५२ गावांचा वीजप्रश्न मार्गी
शेतीपंपांना अधिक सक्षम वीजपुरवठा; आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट तालुक्यातील शेती आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, महापारेषणच्या १३२ के.व्ही./३३ के.व्ही. क्षमतेच्या मैंदर्गी अतिउच्चदाब उपकेंद्राला तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. ही माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
या उपकेंद्राच्या उभारणीनंतर दुधनी, मैंदर्गी, बोरोटी आणि मिरजगी येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांवरील अतिरिक्त भार कमी होणार असून, शेतीपंपांसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक स्थिर, दर्जेदार आणि अखंडित होण्यास मदत होणार आहे. यामुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाड आणि वारंवार होणारे वीजखंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ अक्कलकोट तालुक्यातील एकूण ५२ गावांना होणार आहे. नियमित वीजपुरवठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वीज वेळेत मिळेल, परिणामी कृषी उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
याबाबत बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यातूनच मैंदर्गी अतिउच्चदाब उपकेंद्राला तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, हा तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.
"मैंदर्गी अतिउच्चदाब उपकेंद्राला मिळालेली मंजुरी ही अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. यामुळे ५२ गावांतील वीजविषयक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील. शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास माझे प्राधान्य कायम राहील."— आ. सचिन कल्याणशेट्टी
No comments:
Post a Comment