गण गण गणात बोते'च्या अखंड गजरात कळंब नगरी भक्तिरसात न्हाली; संत गजानन महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत !
कळंब, विलास मुळीक (कटूसत्य वृत्त):- "'गण गण गणात बोते'"च्या अखंड गजरात श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांची पायी दिंडी पालखी शनिवारी सायंकाळी कळंब शहरात दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मांजरा नदीकाठी हजारो भाविकांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करून श्रींचे दर्शन घेतले. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि जयघोषाने कळंब नगरी दुमदुमून गेली.
श्रीक्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीसाठी निघालेली संत गजानन महाराजांची पालखी सायंकाळी सुमारे पाच वाजता धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीत प्रवेश करताच कळंब येथे भव्य स्वागत करण्यात आले. गेल्या सलग ५६ वर्षांपासून कळंब हे पालखीचे मुक्कामाचे स्थान असून यंदा पालखीच्या आगमनाचे ५७ वे वर्ष ठरले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे , उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस निरीक्षक शकील शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, नगराध्यक्षा सुनंदा कापसे,यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पालखीचे पूजन करून श्रींचे दर्शन घेतले.
२१ जून रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथून प्रस्थान केलेली ही पालखी तब्बल ३३ दिवसांचा ७५० किलोमीटरचा पायी प्रवास करत नऊ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करीत २३ जुलै रोजी आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहे. या पालखी सोहळ्यात सुमारे ७५० वारकरी सहभागी झाले आहेत. विदर्भातून पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रमुख आणि मानाच्या पालख्यांपैकी ही एक मानली जाते.
नगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. परळी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, येरमाळा रोड मार्गे पालखी नगर परिषद मैदानात दाखल झाली. तेथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रात्री बापूराव नारायणराव करंजकर यांच्या वाड्यावर वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
पालखीच्या आगमनावेळी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी महामार्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक काकासाहेब रोडगे यांच्यासह दत्ता यादव, किशोर कोळी, अमर माळी, रवी बारकुल आदी कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था सांभाळली.
चौकट : परंपरेचा अखंड वारसा; यंदा ५७ वे वर्ष
श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी गेल्या सलग ५६ वर्षांपासून कळंब येथे मुक्कामाला येत असून यंदा आगमनाचे ५७ वे वर्ष आहे. करंजकर कुटुंबाची तिसरी पिढी भक्तिभावाने वारकरी बांधवांसाठी निवास, अन्नदान व महाप्रसादाची सेवा अखंडपणे करत असून ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात आहे.
चौकट
यांनी मांजरा नदीकाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करून दर्शन घेताना शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष सुनंदा कापसे , उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार हेमंत ढोकले,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार , पोलिस निरीक्षक शकील शेख,



No comments:
Post a Comment