करमाळा आगारात नवीन एसटी बसांचे आगमन; आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते स्वागत
करमाळा(कटूसत्य वृत्त):- करमाळा व कुर्डुवाडी आगारांच्या प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या नव्या एसटी बस आज करमाळा आगारात दाखल झाल्या. आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठपुराव्यातून करमाळा व कुर्डुवाडी आगारांसाठी प्रत्येकी पाच अशा एकूण दहा नवीन बस मंजूर झाल्या असून, त्यापैकी करमाळा आगारासाठीच्या बसांचे स्वागत आज आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक संजय सावंत, श्री आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल, संचालक आबासाहेब अंबारे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, बाजार समिती सदस्य बाळासाहेब पवार, आदिनाथ युवा संचालक रविकिरण फुके, माजी संचालक विठ्ठलभाऊ शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, माजी सदस्य जयराम सोरटे, तात्या काळे, अॅड. लुनावत, अॅड. घोलप, भीमराव गाडगे, उमेश सरडे, शेतकरी नेते अण्णा सुपणावर, विनोद शिंदे, गौतम वारे, बाळासाहेब अडसूळ, रामलिंग देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
करमाळा आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे, स्थानक प्रमुख शिवाजी कानाडे व वाहतूक निरीक्षक पंकज जाधव यांनी आमदार नारायण आबा पाटील यांचा सत्कार करून नवीन बसांच्या आगमनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, करमाळा व कुर्डुवाडी आगारांसाठी पहिल्या टप्प्यात एकूण दहा नवीन बस मंजूर झाल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा नवीन बस पुढील महिनाभरात उपलब्ध होणार असल्याने दोन्ही आगारांच्या बससेवेला अधिक बळ मिळणार आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून ग्रामीण भागातील बसफेऱ्यांमध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
करमाळा आगारातील रिक्त कर्मचारी पदांचा प्रश्नही लवकर मार्गी लावण्यासाठी आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा व कुर्डुवाडी आगारातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यास गती मिळेल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
याशिवाय करमाळा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी यापूर्वी भरीव निधी मंजूर करून हे काम पूर्णत्वास नेल्याची आठवण करून देत, जेऊर येथील नवीन बसस्थानकाचे बांधकामही अंतिम टप्प्यात असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता असून, करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाहीही आमदार नारायण आबा पाटील यांनी यावेळी दिली.
नवीन बस आगारात दाखल झाल्याने चालक, वाहक, कर्मचारी तसेच प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या बसांमुळे करमाळा व परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

No comments:
Post a Comment