अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- वंचित बहुजन आघाडीच्या अक्कलकोट शहर व तालुका शाखेच्या वतीने सोमवारी विविध जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चात महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबतचे फलक झळकविण्यात आले.
ए-वन चौक, कमलाराजे चौक, फत्तेसिंह चौक, मेन रोड, विजय कामगार चौक आणि एस.टी. स्टँड मार्गे हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मडीखांबे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. खतांच्या वाढत्या किमती, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून बेरोजगारीमुळे तरुण वर्ग हवालदिल झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आला. तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेला ७३० कोटी रुपयांचा निधी अन्य योजनांकडे वळविल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यात आला.
मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, डॉ. अनिल जाधव, अॅड. सरोजित बनसोडे, प्रा. सोमनाथ साळुंखे, चंद्रशेखर मडीखांबे, विशाल ठोंबरे, यशवंत इंगळे, बबन गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे, शिलामणी बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment