ड्रायव्हिंग लायसन्स ५० वर्षांपर्यंत वैध राहणार?
'आरटीओ'च्या फेऱ्या संपणार; सरकार नियम बदलण्याच्या तयारीत
नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त) : देशातील कोट्यवधी वाहनचालक आणि वाहनमालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, नवीन प्रस्तावानुसार ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता थेट ५० वर्षांपर्यंत वाढविण्याचा विचार सुरू आहे.
सध्या नवीन ड्रायव्हिंग लायसन्स साधारणपणे २० वर्षांसाठी वैध असते. त्यानंतर लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते. मात्र, नवीन प्रस्ताव अमलात आल्यास वाहनचालकांना वारंवार नूतनीकरणाच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. त्यामुळे कागदपत्रांची कटकट आणि आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्यांमधून मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्याच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’ मोहिमेअंतर्गत हा महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे.
वाहन हस्तांतरणही होणार पूर्णपणे डिजिटल
सरकार वाहनांच्या खरेदी-विक्री प्रक्रियेतही मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. वाहनाची मालकी हस्तांतरण (व्हेईकल ओनरशिप ट्रान्सफर) तसेच विविध प्रकारच्या परमिटचे नूतनीकरण पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास जुनी गाडी खरेदी किंवा विक्री केल्यानंतर नाव हस्तांतरणासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून घरबसल्या काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
नवीन प्रणालीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर अधिक प्रभावी कारवाई करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. नियमभंग केल्यास चालकांच्या खात्यात ‘नेगेटिव्ह मार्किंग’ अर्थात गुण वजा केले जातील. एखाद्या चालकाच्या खात्यात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नकारात्मक गुण जमा झाल्यास त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तात्पुरते निलंबित केले जाऊ शकते किंवा गंभीर प्रकरणांमध्ये कायमचे रद्दही केले जाऊ शकते.
या प्रस्तावित बदलांमुळे वाहनचालकांसाठी सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि डिजिटल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment