ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संतप्त; मुदतवाढीची मागणी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३० जून निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अक्कलकोट तालुक्यात ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने हजारो शेतकरी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे पुढील हप्ता मिळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने ३० जूनपर्यंत ई-केवायसी अनिवार्य केली असून, मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पीएम-किसान योजनेच्या लाभावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना ओटीपी पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत. आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न नसणे, पोर्टलचा सर्व्हर वारंवार बंद पडणे किंवा ओटीपी वेळेत न मिळणे यामुळे अनेकांची प्रक्रिया रखडली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी दूरवरून सीएससी केंद्रांवर येत असले तरी तांत्रिक अडचणींमुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
बायोमेट्रिक पडताळणीदरम्यान वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याची समस्या देखील गंभीर बनली आहे. दिवसभर प्रतीक्षा करूनही फिंगरप्रिंट पडताळणी न झाल्याने अनेक ज्येष्ठ शेतकरी हतबल झाले आहेत. अशा लाभार्थ्यांसाठी फेस ऑथेंटिकेशन तसेच सीएससी केंद्रांमार्फत पर्यायी पद्धतीने ई-केवायसीची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
याशिवाय आधार कार्डावरील नाव आणि पीएम-किसान पोर्टलवरील नावातील स्पेलिंगमधील फरक, जन्मतारखेतील त्रुटी तसेच इतर माहितीतील विसंगती यांमुळेही अनेक शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी ई-केवायसीपासून वंचित राहत असल्याने शासनाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन अंतिम मुदतीत वाढ करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी खाजप्पा ढाले यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment