विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे

 विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे



     

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- राज्यभरातील सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ही सर्व शासकीय व खाजगी शाळा आज मोठ्या उत्साहात व आनंदात सुरू झाल्यात. सोलापूर शहराजवळील मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
     यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या.
त्यांनी विद्यार्थ्यांना तीन गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला – आई-वडील, शिक्षक आणि शाळेतील मित्र. तसेच मी जे काही आहे त्याचे श्रेय माझ्या शिक्षकांना जाते, असेही त्यांनी सांगितले.
    जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा सोलापूर शहरालगत आहे. शहरामध्ये खाजगी शाळांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. तरीही या शाळेतील शिक्षक वृंद यांनी येथील पटसंख्या कमी न होऊ देता त्यात वाढच केलेली आहे. मागील वर्षी 150 पटसंख्या असलेली ही शाळा यावर्षी 194 पटसंख्येपर्यंत घेऊन जाण्यात शाळेतील शिक्षकांनी मौलिक भूमिका बजावलेली आहे, त्यामुळे त्यांचे खूप कौतुक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगून असेच काम पुढेही करून विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
    या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, मुख्याध्यापक प्रकाश राचेटी, माजी मुख्याध्यापक शिवानंद भिमन्नवरु, केंद्र प्रमुख सिद्राम वाघमोडे, विस्तार अधिकारी बापूराव जमादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, नगरसेविका वैशाली भोपळे, तसेच शिक्षक अप्पासाहेब ऊंबरानी, अमसिद्ध तीर्थकर व इतर शिक्षक उपस्थित होते.
   प्रारंभी मजरेवाडी येथील  शाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर फित कापून शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी वेदश्री विष्णू माने हिने एटीएस परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
        शिक्षक अप्पासाहेब ऊंबरानी यांनी प्रस्तावित केले. व आजचा शाळा प्रवेश उत्सव विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले. शाळेसमोरील वाहतुकीच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचीही त्यांनी मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages