पीकविम्यासाठी कल्याणशेट्टींची आक्रमक मागणी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा वेळेत व पूर्ण स्वरूपात मिळावा, तसेच पीकविमा योजनेतील रद्द करण्यात आलेले चार महत्त्वाचे निकष तातडीने पूर्ववत करावेत, अशी जोरदार मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत केली.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत 'पेरणी न होणे', 'हंगामातील प्रतिकूल परिस्थिती', 'स्थानिक नैसर्गिक आपत्ती' आणि 'काढणीनंतरचे नुकसान' हे चार महत्त्वाचे ट्रिगर्स शासनाने रद्द केल्यामुळे यंदा पीकविमा भरपाईत मोठी घट झाली असून अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
गत चार वर्षांत महायुती सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली होती. मात्र यंदा ही मदत केवळ २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
नैसर्गिक आपत्ती, उत्पादनातील घट आणि वाढता आर्थिक ताण यामुळे बळीराजा आधीच संकटात सापडला असून अशा परिस्थितीत त्याला वाऱ्यावर सोडणे योग्य ठरणार नाही, असे सांगत शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पीकविमा योजनेतील रद्द करण्यात आलेले चारही निकष तातडीने पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी आमदार कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
No comments:
Post a Comment