एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार", खासदार ओमराजे निंबाळकर यांची घोषणा
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
धाराशिव (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची मोठी चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हे 'ऑपरेशन टायगर' राबवलं जात असल्याचं सांगितलं जातं.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. मात्र, या सहा खासदारांमध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश असल्याने त्यांच्या बंडखोरीची मोठी चर्चा होत आहे.
यातच दोन दिवसांत आपण कार्यकर्त्यांशी बोलून भूमिका जाहीर करणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं होतं. यानंतर आज ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अखेर मोठी घोषणा केली आहे. “आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असून यापुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत”, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
“माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती केली होती की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. मी सर्वांशी चर्चा केली, सर्वांची मतं जाणून घेतली आहेत. आता मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक जवळचे कार्यकर्ते पराभूत झाले आहेत. आम्ही कधीही लोकांच्या कामात कमी पडलो नाहीत. पण दुर्देवाने सत्तेमुळे आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. सर्वसामान्य माणसांच्या कामासाठीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहोत. आज आम्ही निर्णय घेतला आहे की शिवसेना (शिंदे) पक्षात आम्ही जाणार आहोत. यापुढे आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार आहोत”, अशी घोषणा ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
“ज्या कारणांमुळे मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं होतं की वाईट वृत्तीचे लोक कोणत्याही परिस्थितीत राजकारणाच्या पटलावर राहिले नाही पाहिजेत. ही भूमिका मी आजपर्यंत निभावत आलो. कायदेशीर बाबींमध्ये देखील आम्ही लढलो. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाची २० वर्ष न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. या निकालातून आम्हाला फार अपेक्षा होत्या. पण जो काही निकाल आला, तो अतिशय दुर्देवी आहे. या सर्व प्रकरणात एक माणूस खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा होता. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यानंतर त्यांनी अमित शाह यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. तेव्हा आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की २० वर्षांपासून आम्ही न्याय मागत आहोत, तो न्याय आम्हाला मिळावा. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वत: समोर येऊन त्याबाबत सांगितलं. आता सीबीआय या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळावा”, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

No comments:
Post a Comment