आषाढी यात्रेच्या काळात स्वागत कमानी उभारल्यास कॉंग्रेस कार्यकर्ते कमानी काढून टाकणार
किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल कौलगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
पंढरपूर-(कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेच्या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा असून आजपर्यंत इतिहासात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील, शरद पवार, स्व.विलासराव देशमुख यांच्यासह अनेक मुख्यमंत्री होवून गेले मात्र त्यांनी कधीही आषाढी यात्रेच्या कालावधीत स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पालखी सोहळा प्रस्थान ते श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत स्वागत कमानी उभारल्या नाहीत व राज्य सरकारच्या तिजोरीतून जाहिरातबाजी केलेली नाही. तसेच स्वत:ची प्रसिध्दी केलेली नाही. या उलट वारकरी, भाविकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले. परंतू गेल्या वर्षीपासून भाजप फडणवीस सरकारच्या काळात स्वत:च्या प्रसिध्दीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर भार टाकून ग्रामविकास विभागाने आषाढी यात्रा पालखी सोहळा प्रस्थान ते श्रीक्षेत्र पंढरपूर या भागातील प्रत्येक गावात स्वागत कमानी उभारल्या गेल्या. यात केवळ भाजप नेत्यांचे फोटो असतात. या स्वागत कमानीमुळे गावचा इतिहास व गावाची ओळख पुसून गेली त्यामुळे मागील वर्षी भाविकांना, पोलीस प्रशासन व इतर नागरिकांना पालखी मुक्कामाचे गाव व विसाव्याचे ठिकाण लवकर समजू शकले नाही. त्यामुळे राज्य सरकारने यंदाच्या वर्षी सर्व पंढरपूरमध्ये येणाऱ्या पालखी मार्गावरून पालखी प्रस्थान ते श्रीक्षेत्र पंढरपूर या भागात कोणत्याही प्रकारच्या स्वागत कमानी उभ्या करू नयेत. त्यामुळे वारकऱ्यांना अडथळा होत असतो व पोलीस प्रशासनास कायदा व सुव्यवस्था सुरक्षितता करताना मोठा नाहक त्रास होत असतो. जर यावर्षी स्वागत कमानी उभ्या केल्या तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून त्या कमानी काढून टाकण्यात येतील असा इशारा किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल कौलगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, विशेष म्हणजे वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी काढण्यात येणारे सर्व निविदा या सोलापूर जिल्हा परिषदमधून प्रसिध्द केलेल्या आहेत यामध्ये पुणे जिल्हा व सातारा जिल्हा क्षेत्रासाठी स्वतंत्र निविदा प्रसिध्द करणे आवश्यक असताना पालकमंत्री यांच्या हट्टामुळे सर्व निविदा सोलापूर जिल्हा परिषदमधून प्रसिध्द केलेल्या आहेत परंतू सोलापूर जिल्हा परिषदेची तेवढी क्षमता नसताना या सर्व निविदा हा सोलापूर जिल्हा परिषदमधून काढण्यामागे नेमका कोणता हेतू आहे ? यामुळे सोलापूर जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचे केंद्र बनत चालले आहे व अधिकाऱ्यांना पैसे खाण्यासाठी कुरन बनत आहे. आजपर्यंत सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्याच्या निविदा या स्वतंत्र निघत होत्या मात्र यंदा केवळ सोलापूर जिल्हा परिषदेतून तीन जिल्हा परिषदेच्या एकत्र निविदा काढण्यात येत आहेत याचा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करावा.
त्याचबरोबर जर्मन हॅंगर शेड भाड्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येत आहे. त्याऐवजी कायमस्वरूपी रस्ता, पालखी स्थळावर कायमस्वरूपी पत्राशेड, शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी उंच पाण्याच्या टाक्या, कायमस्वरूपी शौचालये व इतर सुविधा कशा देता येतील याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा व शासनाचा विनाकारण होणारा खर्च कमी करण्यास मदत होईल, असे आवाहन ही या निवेदनातून करण्यात आले आहे.
या निवेदनाची प्रत विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले, सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जि.प.सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सोलापूर ग्रामीण पोलीस दलचे पोलीस अधिक्षक यांना ईमेल पाठविण्यात आलेली आहे.

No comments:
Post a Comment