भीषण दुष्काळाच्या तोंडावर माढ्याच्या 'लढाऊ नेत्याचा' जिल्हाधिकाऱ्यांना इशारा. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 21, 2026

भीषण दुष्काळाच्या तोंडावर माढ्याच्या 'लढाऊ नेत्याचा' जिल्हाधिकाऱ्यांना इशारा.

 भीषण दुष्काळाच्या तोंडावर माढ्याच्या 'लढाऊ नेत्याचा' जिल्हाधिकाऱ्यांना इशारा





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- भीषण दुष्काळाची सावली गडद होत असतानाच, शासनाने उजनी धरण आणि भीमा नदी परिसरातील शेती पंपांची वीज अवघी दोन तास करून पाणी राखीव ठेवण्याचे जे तुघलकी धोरण आखले आहे, त्याविरोधात माढा तालुक्याच्या कोंढार भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचे हक्काचे कैवारी श्री. शिवाजीराव बलभीम पाटील (चांदजकर) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "धरण आणि नदीत पाणी उपलब्ध असताना, केवळ नियोजनाच्या नावाखाली वीज बंद करून शेतकऱ्यांना देशोधड्याला लावणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्या," अशा मागणीचे जळजळीत निवेदन त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने हा अन्यायकारक निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
२५-३० वर्षांची लढवय्यी परंपरा; प्रस्थापितांना पुन्हा ललकारले! गेल्या २५ ते ३० वर्षांपासून माढा तालुक्यात गोरगरीब, कष्टकरी, शालकरी मुले आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे एक धाडसी आणि निधड्या छातीचे नेते म्हणून शिवाजीराव पाटील (चांदजकर) यांची ख्याती आहे. प्रस्थापितांच्या दडपशाहीला न जुमानता नेहमीच जनसामान्यांची बाजू लावून धरणाऱ्या या नेत्याने आता येऊ घातलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची ढाल बनण्याचे ठरवले आहे. भाई-भाई विद्यालयाचे संस्थापक असणारे पाटील हे केवळ शिक्षणाच्याच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या पोटाच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून नेहमीच चळवळीत अग्रभागी राहिले आहेत.
हजारो कोटींचे नुकसान सोसणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिवाजीराव पाटील यांनी शासनाच्या धोरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सध्या जून महिना सुरू असून, धरणात आणि नदी पात्रात पाणी शिल्लक आहे. असे असतानाही केवळ दोनच तास वीज देऊन पाणी राखून ठेवण्याचे जे नियोजन शासनाने केले आहे, ते अत्यंत चुकीचे आणि घातकी आहे. या निर्णयामुळे उजनी आणि भीमा नदीच्या संपूर्ण पट्ट्यातील उभी पिके जळून खाक होतील आणि शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे अतोनात नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

"पाणी असूनही ते शेतकऱ्यांच्या पिकांना न मिळणे हा बळीराजावरचा अन्याय आहे. शासनाने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोष निर्माण करणारा हा आदेश तात्काळ मागे घ्यावा. आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात; अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करू!
श्री. शिवाजीराव बलभीम पाटील (चांदजकर)(संस्थापक, भाई भाई विद्यालय व शेतकरी नेते)


नदीकाठच्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष; लढाई आरपारची! शासनाच्या या 'लाईट कपात' धोरणामुळे संपूर्ण माढा तालुक्यात आणि नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला शेतकरी आता शासनाच्या या जाचक निर्णयामुळे पुरता कोलमडून गेला आहे. अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे धावून आलेले भाई शिवाजीराव पाटील (चांदजकर) यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी या अगोदर माढा तालुक्याचे माजी आमदार भाई एस एम पाटील बरोबर शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यात प्रश्नासाठी उजनी धरणावरील दरवाजे खोलण्यासाठी टेंभा मोर्चाही काढला होता असे ते लढाऊ नेते आहेत
आता जिल्हाधिकारी साहेब शेतकऱ्यांचा हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवून तो काळा आदेश रद्द करतात, की माढ्याच्या या लढाऊ नेत्याच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्काचा मोठा एल्गार सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 





No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages