संतांचिया गावा प्रेमाचा सुकाळ- इंद्रजित देशमुख
अकलूज (कटूसत्य वृत्त):- तरुणांनी ज्या वयात पत्नी समवेत निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा, मौजमजा करावी, निसर्गात रमाव त्या वयात प्रा स्वामीराज भिसे यांनी देश पादाक्रांत करुन संतांचा शोध घेतला. त्यांचा शांती, समता व बंधुता हा विचार " जाता संतांच्या गावा " या पुस्तकाच्या माध्यमातून समाजा समोर मांडण्याचा प्रयत्न केला. संताचिया गावा प्रेमाचा सुकाळ याची अनुभूती घेतली. आज याच विचारांची जगाला गरज आहे असे मत संत साहित्याचे अभ्यासक व माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
अकलूज येथील रुपा बॅकवेट हॉल मध्ये आनंदमूर्ती पब्लिकेशन व मराठी साहित्य परिषद शाखा अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा स्वामीराज भिसे लिखीत " जाता संतांच्या गावा " या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते व संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष ह भ प बापूसाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रकाशन समारंभास शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील, रिंगण चे संपादक सचिन परब, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, मराठी साहित्य परिषद शाखा अकलूजचे अध्यक्ष डॉ विश्वनाथ आवड, आनंदमूर्ती पब्लिकेशनचे औदुंबर भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रा स्वामीराज भिसे यांनी " जाता संतांच्या गावा " या पुस्तकाची माहिती देऊन महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब आदी राज्यात जाऊन संतांची माहिती संकलित करताना आलेल्या अडचणी विषद केल्या. परंतु यातून खरां आनंद प्राप्त झाल्याचे ते म्हणाले.
शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या,वास्तविक पाहता आपण सर्वजणच दैनंदिन जीवन जगत असतो परंतु भिसे परिवार हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेत आहे. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे काम चालू असते . भिसे परिवार म्हणजेच शिवरत्न परिवार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या पुस्तक प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा रोहित देशमुख यांनी केले.

No comments:
Post a Comment