महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी?
मुंबई (कटूसत्य वृत्त):- वाढत्या पाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत उन्हाच्या तीव्र झळांनी जीव कासावीस होत आहे. सर्वाधिक 44 अंश तापमान असलेल्या अकोल्यामध्ये रिक्षामध्ये एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर हिंगोली मध्ये शेख रफिक शेख उस्मान या 30 वर्षे तरुणाचा बसस्थानक परिसरात मृत्यू झाला आहे. तर वाशिममधील नर्सरीमध्ये 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये 'कोल्ड रूम' आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील २७ जिल्ह्यांना अति-उच्च उष्णतेचा धोका आहे. ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका आहे. ७६ टक्के लोकसंख्येला उष्णतेचा धोका आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला असून त्यानुसार एसओपी पण जाहीर करण्यात आली आहे.पुढील 4 दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.कुठल्या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट आहे पाहूया...
या ९ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट-
सांगली
सोलापूर
संभाजीनगर
जालना
परभणी
हिंगोली
अकोला
अमरावती
वर्धा
वाढत्या उष्णतेमुळे उघड्यावर काम करणारे मजुर, कामगार, शेतकरी यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात, 'प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर' म्हणजेच पुढचा दीड महिना कडक उन्हाचा असल्याने आजारी पडण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

No comments:
Post a Comment