सोलापूर जिल्ह्याच्या वतीने गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन बार्शी येथे श्री भगवंत मंदिर इथपासून ते मुख्य रस्त्यावरून लिंगायत बोर्डिंग पर्यंत या मार्गावर करण्यात आले . या शोभायात्रेत हजारो अनुयायी सहभागी होत हिंदू वर्षाच्या शुभेच्छा देत विविध सामाजिक विषयावर प्रभावी संदेश देत जनजागृती करत होते. महाराष्ट्रासह गुजरात तेलंगणा व कर्नाटक या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही अशाच शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची मोठी प्रतिमा सुशोभित अशा रथामधे विराजमान झालेली होती. या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ती रस्त्याच्या एका बाजूने एका सरळ रेषेत चालत लयबद्ध पद्धतीने भजनाच्या गजरात व ढोल ताशांच्या निनादात अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पुढे सरकत होती. शोभायात्रेत सहभागी सर्व भाविकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून उत्सवाला विशेष रंगत आणली. महिला भगिनी मोठ्या संख्येने नटून थटून सहभागी झाल्या होत्या. कलशधारी महिला , भगवे ध्वजदारी महिला व पुरुष, छत्रपती शिवरायांचा घोड्यावर आरुढ झालेला देखावा, जगद्गुरुश्रींच्या गीतावर ताल धरणारे महिलांचे लेझीम पथक, छत्रपती शिवरायांचे मावळ्यांचा देखावा ,खंडेरायांचा देखावा, राम - सीता , लक्ष्मण व सोबत मारुतीराया (राम - पंचायतन) देखावा , श्री स्वामी समर्थ देखावा , श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा देखावा , संभाजीराजे देखावा , ढोल पथक तसेच मरणोत्तर देहदान या उपक्रमाबाबत संदेश देणारे व हिंदू संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देणारे फलक घेऊन सामील झालेले युवा असे देखावे हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.
या शोभायात्रेमध्ये सर्व वयोगटातील तरुण युवती पुरुष व महिला भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सहभागी असणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची व सोयी सुविधांची योग्य ती काळजी आयोजकांकडून घेण्यात आली होती.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने रामानंद संप्रदायामार्फत विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. यामध्ये महामार्गावरील ॲम्बुलन्स सेवा, मरणोत्तर देहदान व अवयवदान , गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत CBSC शिक्षण, सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी मोफत पाठशाळा, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, आपत्कालीन सेवा तसेच दुर्बल घटकांचे पुनर्वसन यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे . या सर्व समाज हितकारी कार्यामुळे रामानंद संप्रदायाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक व प्रशंसा होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment