कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न? DGCA विरोधात FIR दाखल करण्यास पोलिसांचा नकार
अजितदादांना न्याय मिळत नसेल सामान्यांना कसा न्याय मिळणार? रोहित पवार आक्रमक
मुंबई (कटूसत्य वृत्त):- अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी तपासात अनियमितता झाल्याचा आरोप करत आ. रोहित पवार यांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाविरुद्ध (Directorate General of Civil Aviation) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासाठी ते थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलनाला बसले; मात्र पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिल्याने त्यांनी बारामतीत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
ठिय्या, वाद आणि ‘वरून फोन’चा आरोप
रोहित पवार यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची तीव्र हुज्जत झाली. पवार यांचा दावा आहे की, सुरुवातीला त्यांचे निवेदन नोंदवण्यास सुरुवात झाली; मात्र नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर “FIR नोंदवता येणार नाही” असे सांगण्यात आले. “एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
VSR कंपनी व DGCAवर संशय
पवार यांनी आरोप केला की, संबंधित VSR कंपनीच्या २५ पैकी ५ विमानांना उड्डाणबंदीचे आदेश देणारे परिपत्रक DGCAने काढले होते. यावरून कंपनीची भूमिका संशयास्पद असल्याचे “अप्रत्यक्षपणे समोर येते”, असा त्यांचा दावा आहे. “पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे; म्हणूनच DGCA, सीआयडी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या भूमिकेची चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
“नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवा”
नवीन फौजदारी कायद्यांच्या तरतुदीनुसार (FIR नोंदवण्याच्या कर्तव्याबाबत) पोलिसांनी गुन्हा नोंदवणे बंधनकारक असल्याचा पवार यांचा दावा आहे. “मारामारी झाली तरी FIR होते; मग पाच जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात वेगळा नियम का?” असा सवाल त्यांनी केला.
पुढील पाऊल: बारामतीत तक्रार
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आपण सकाळी १० वाजता जाणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. “अजितदादांना न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर तपास प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. अपघात की घातपात, याबाबत विरोधी मतप्रवाह समोर येत असून अधिकृत तपास यंत्रणांनी अद्याप अंतिम निष्कर्ष जाहीर केलेला नाही.
या संदर्भात मुंबई पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळू शकले नाही. DGCA किंवा संबंधित मंत्रालयाकडूनही प्रतिक्रिया येणे बाकी आहे.
प्रकरण संवेदनशील असल्याने सखोल, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशीची मागणी राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. पुढील घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले आहे.
चौकट-
तो फोन कुणाचा?
अजितदादांच्या विमान अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना आता सर्वांना माहिती आहे. एफआयआर करताना एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी वाद झाला. त्यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्याने हुज्जत घातली. एफआयआर नोंदवायला सुरुवात झाली होती. माझं स्टेटमेंट नोंदवायला सुरूवात झाली तेव्हाच एका मोठी अधिकारी तिथे आले. डीसीपी तिथे आले, ते म्हणाले गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ शकत नाही. तुम्हाला कुणाला सांगायचे ते सांगा आम्ही गुन्हा नोंदवणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. मग त्यांना कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला असा सवाल रोहित पवार यांनी केला.
.png)
.png)
0 Comments