नियोजन व्यवस्थित असेल तर संस्था चांगल्या चालतात- राजन पाटील
श्रीकृष्ण पतसंस्थेचा पहिला वर्धापन दिन उत्साहातकुरुल (कटूसत्य वृत्त):- कोणतीही संस्था काढणे सोपे असते, मात्र ती चालवणे फार कठीण. मात्र गरिबीतून पुढे आलेल्या प्रा. प्रमोद अवताडे यांनी ज्या संस्था उभ्या केल्या, त्या ठामपणे चालवून दाखवल्या. संस्थेतील कर्मचारी व्यवस्थित हाताळले. त्यामुळे भविष्यात देखील त्यांना चांगला स्कोप असून इथून पुढे सुरू केलेल्या संस्था चांगल्या व व्यवस्थितच चालवाव्या आणि नियोजन सूक्ष्म व काटेकोरपणे असेल तरच संस्था चांगल्या चालतात असे प्रतिपादन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
कामती बु. (ता. मोहोळ) येथील श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चेअरमन प्रा. प्रमोद आवताडे, व्हाईस चेअरमन हनुमंत निकम, ज्येष्ठ नेते शिवानंद पाटील, रामराव भोसले-पाटील, बाबासाहेब क्षीरसागर, जालिंदर लांडे, दीपक माळी, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अस्लम चौधरी, अंकुश आवताडे, जयसिंग अवताडे, पंडित निकम, बाबासाहेब जाधव, वैभव गुंड, माऊली जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. प्रमोद अवताडे म्हणाले की, संघर्ष काय असतो हे मी अगदी जवळून पाहिले आहे. समाजामध्ये कसलीच पद नसताना मी नोकरीसाठी अनेक ठिकाणी फिरलो. आज विद्यार्थ्यांच्या आशीर्वादामुळे माझे व्यवसाय उद्योग भरभराटीला आले आहेत. त्यामुळे समाजात पत नसलेल्या माणसांची पत निर्माण करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी पतसंस्थेची स्थापना केली आहे. प्रत्येक ग्राहक हा आमच्यासाठी देव आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीच अडचण न येण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे सांगून राजन मालकांसारखे वडीलधारी नेतृत्व माझ्या पाठीमागे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, यावेळी पतसंस्थेतील ठेवीदारांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन मिसाळ यांनी केले.
.png)
0 Comments