पापरी, खंडाळी गावांचा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 16, 2025

पापरी, खंडाळी गावांचा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करा

 पापरी, खंडाळी गावांचा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- थकीत वीज बिलासाठी पाप आणि खंडाळी या दोन गावांतील शेतकऱ्यांच्या डीपीचा वीजपुरवठा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडित केला. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. या डीपीचा वीजपुरवठा तत्काळ सुरू आणि शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या खांबाचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे भाडे मिळावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून (दि. १४) मोहोळ येथील महावितरण कंपनीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गावातील शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे विहित कालावधीत वीजदेयकाची मागणी करायला हवी होती. मात्र, या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थकीत रकमा लाखोंच्या घरात गेल्यानंतर वीज बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. या गावातील शेतकरी वीज बिलापोटी दहा हजार रुपये भरण्यासाठी गेले असता, ते बिल अधिकाऱ्यांनी भरून घेतले नाही. एकीकडे शासन शेतकऱ्यांचे शून्य बिल केले असल्याचे सांगत असताना,महावितरणचे अधिकारी मात्र दुटप्पी भूमिका घेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या डीपीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसाने पाणी उपलब्ध होत आहे.
अशावेळी हाताला आलेली खरिपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.शेतांमध्ये महावितरणचे खांब उभारले आहेत. त्याचे भाडे गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे महावितरणने आधी शेतकऱ्यांना भाडे द्यावे,मगच वीज बिलाची मागणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.आंदोलनात लोकनेते साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सतीश भोसले, दत्तात्रय कदम, जनहित शेतकरी संघटनेचे नानासाहेब मोरे, भाऊसाहेब पाटील, गोवर्धन घोलप,बालाजी कदम, पोपटराव सावंत, संजय भोसले, बापू बंडगर, उमेश माने, गोरख हैदळे, आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages