Hot Posts

6/recent/ticker-posts

आम्ही कामं कशी करायची? मंत्र्यांनी शिंदेंसमोर तक्रारींचा पाढा वाचला

 आम्ही कामं कशी करायची? मंत्र्यांनी शिंदेंसमोर तक्रारींचा पाढा वाचला



मुंबई (कटूसत्य वृत्त):- प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुतीत दिवसागणिक अधिकाधिक खटके उडू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत वाद सुरु असताना आता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची तक्रार केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वितुष्ट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावेळी सेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवारांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. अजित पवार निधी देत नाहीत, विकासकामांमध्ये अडथळे आणतात, अशा तक्रारी मंत्र्यांकडून शिंदेंकडे करण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल सेनेच्या सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. ही बैठक २ तास चालली. तीन पक्षांचं सरकार असल्यानं सगळ्यांना समान संधी मिळणं गरजेचं आहे. विकासनिधीचं समान वाटप होणं आवश्यक आहे. पण अर्थमंत्री अजित पवार आमच्या खात्यांना पुरेसा निधी देत नाहीत. मग विकासकामं करायची कशी, असा सवाल मंत्र्यांनी शिंदेंना विचारला.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अजित पवारांबद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. त्यावर मी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलतो. लवकरच या प्रकरणात मार्ग निघेल, असा शब्द शिंदे यांनी मंत्र्यांना दिला. त्यामुळे आता या प्रकरणात शिंदे कसा मार्ग काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात सेनेचे ४० आमदार सत्तेतून बाहेर पडले. अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. पण अवघ्या वर्षभरात अजित पवारही बंड करत सत्तेत आले आणि अर्थमंत्री झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा सेनेचे मंत्री अजित पवारांच्या तक्रारी करु लागले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments