संततधारेने पंढरपुरात पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारीही अनेक भागांना पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सलगच्या पावसामुळे शिवारात पाणी साचले आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ होताना दिसत आहे.
अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असतानाच सलग पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यात सातत्याने जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे 34.7 हेक्टरवरील फळबागेस फटका बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामपूर्व कामात व्यत्यय आला आहे. सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना दक्ष राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर शहर आणि तालुक्यात शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात एका ८० वर्षांच्या महिलेचा गोठा अंगावर पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना ताकमोगे वस्तीवर घडली.
दरम्यान, या पावसामुळे पळशी (ता. पंढरपूर) येथे भुईमुगाच्या पिकात पाणी साचल्याने चिखलातून काढणी सुरू आहे. पंढरपूर तालुक्यात उन्हाळी धान पीक वादळ वाऱ्यामुळे आडवे झाले आहे. तालुक्यात उन्हाळी भुईमूग काढणे अशक्य झाले. अनेक शेतकऱ्यांना भुईमूग वाळवता देखील आला नाही. त्यामुळे पिकांची माती झाली आहे. तसेच पावसाळ्यामुळे वीटभट्टीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वीटभट्टी मालकास ही मोठा अर्थिक फटका बसला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल
देशभरात पूर्वमान्सूनला सुरुवात झाली असून, मान्सून केरळमध्ये दाखल कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज होता, तो खरा ठरला आहे. या वर्षी गेल्या १६ वर्षांमध्ये केरळमध्ये सर्वात लवकर मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. केरळच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
0 Comments