Hot Posts

6/recent/ticker-posts

संतोष देशमुख प्रकरणी बोलणाऱ्या नेत्यांच्या जीवाला धोका, फडणवीसांनी गांभीर्य ओळखावं

 संतोष देशमुख प्रकरणी बोलणाऱ्या नेत्यांच्या जीवाला धोका, फडणवीसांनी गांभीर्य ओळखावं




शरद पवारांची CM कडे मागणी


मुंबई (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाविरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांना येणाऱ्या धमक्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा आणि त्यांना राज्य सरकारमार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राची कॉपी 'एक्स' सोशल मीडियावर शेअर करत भूमिका मांडली. "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते."

"बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत." असे पुढे शरद पवारांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे कोणती मागणी?
"असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे." असेही पवारांनी पुढे लिहिले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा पुण्यात रविवारी काढण्यात आला. या मोर्चाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदार, खासदार यांनी मोर्चाकडे पाठ फिरविली.

Reactions

Post a Comment

0 Comments