Hot Posts

6/recent/ticker-posts

गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांनी ज्ञान व माहिती वृद्धिंगत करीत लुटला पर्यटनाचा मनसोक्त आनंद

 गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांनी ज्ञान व माहिती वृद्धिंगत करीत लुटला पर्यटनाचा मनसोक्त आनंद



माढा (कटूसत्य वृत्त):- चार भिंतीच्या आत घेतल्या जाणाऱ्या औपचारिक पुस्तकी शिक्षणाबरोबरच बाहेरच्या विश्वातील अनौपचारिक शिक्षण घेऊन ज्ञान व माहिती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात शिक्षक शैक्षणिक सहलींचे आयोजन करतात.विविध भौगोलिक,धार्मिक,ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेटीचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व माहिती मिळविण्याची संधी उपलब्ध करून देतात.असाच पर्यटनाचा सुखद अनुभव गुलाबी थंडीत आनंदनगर-मानेगाव ता.माढा येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी त्यांना बौद्धिक ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान व बाहेरचे जग दाखवून त्यांना अष्टपैलू व सर्वगुणसंपन्न बनविणे ही काळाची गरज आहे.ही बाब ओळखूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय शैक्षणिक सहलीचे नेटके नियोजन केले होते.या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर,ऐतिहासिक रंकाळा तलाव,राधानगरी धरण व अभयारण्य,रत्नागिरी जिल्ह्यातील नान्निज मठ व परिसर,जाकोबा देवी दर्शन, गणपतीपुळेचे मंदिर व निसर्गरम्य समुद्रकिनारा, वेळणेश्वर मंदिर व हेदवी बीच, गुहागर,चिपळूण येथील परशुरामाचे मंदिर,सावर्डे येथील शिवसृष्टी,सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर,निसर्गरम्य उद्यान व विविध प्राण्यांच्या प्रतिकृती,कोयना धरण निर्मिती व वीज प्रकल्प उभारणीचे सर्व टप्पे प्रोजेक्टरवरती पाहणे, सदाहरित वृक्ष व घनदाट जंगल, श्रीराम मंदिर आदी भौगोलिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांना भेटी दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी उंटावर बसून सफर, समुद्रकिना-यावर वाहनातून प्रवास,समुद्रातील स्नान, समुद्रातील फेसाळणा-या उंचच उंच लाटा,नद्यांचे प्रवाह,नारळ, सुपारी,फणस,काजू,आंबा आदी वृक्ष व वेली पाहून आनंद द्विगुणित केला.ही विविध ठिकाणे पाहताना विद्यार्थ्यांमध्ये भरपूर कुतूहल व जिज्ञासा निर्माण झाली होती.शिक्षकांनी त्यांना माहिती दिली.घाट व तीव्र उताराच्या रस्त्यावरील प्रवासाचा आनंद व थरारक अनुभव घेताना काही प्रसंगी हृदयाचे ठोके चुकत होते. यासोबतच सर्वांनी कोकणातील स्वादिष्ट व रुचकर नाष्टा आणि जेवणाचा मनसोक्त व मनमुराद आस्वाद घेतला.

या शैक्षणिक सहलीत शिक्षक व इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

-चौकट-
 विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष ज्ञान,माहिती व अनुभवात भर पडावी या उद्देशाने नियमांचे काटेकोरपणे शैक्षणिक सहलींचे पालन करुन आयोजन केले जाते.ही बाब निश्चितच चांगली व उपयुक्त आहे.विद्यार्थ्यांना निसर्गरम्य स्थळे व जंगले, छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली ठिकाणे,गड-किल्ले,नद्या, समुद्रकिनारे,धबधबे,घाट,खाडी,अभयारण्ये,पशुपक्षी व प्राणी, विविध ठिकाणची पीके, वनस्पती,मृदा व खडकांचे प्रकार पाहण्याची संधी मिळते त्यामुळे आनंददायी व प्रत्यक्ष पाहणीतून ज्ञान व माहिती वृद्धिंगत होण्यास मदत होते परंतु सहलीच्या वेळी शिक्षकांनी नियम व अटींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments