Hot Posts

6/recent/ticker-posts

माणदेश" जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण "आटपाडी " व्हावे. - सादिक खाटीक .

 माणदेश" जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण "आटपाडी " व्हावे. - सादिक खाटीक .





 शरदचंद्रजी पवार, राम नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांना साकडे .


__________
आटपाडी दि . ११ ( प्रतिनिधी )
                लवकरच होवू घातलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण " आटपाडी " व्हावे, या न्याय लक्षवेधी मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना तातडीने सुचित केले जावे, यासाठीचे साकडे आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी अनेक मान्यवर महोदयांना घातले आहे .
                राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आटपाडीचे सुपुत्र उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक साहेब, राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, आटपाडीचे आणखी एक सुपुत्र राजीव खांडेकर यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदार महोदय, महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषदेतील सर्व आमदार महोदय, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा, राज्यसभेवरील सर्व खासदार महोदय , विधानसभा, विधान परिषदेतील सर्व आमदार महोदय आणि
सर्व दैनिकांचे संपादक / प्रतिनिधी महोदय, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयातील न्युज चॅनेल्सचे संपादक / प्रतिनिधी महोदय या सर्वांना ईमेलद्वारे साकडे घातले आहे .
                महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या ३६ जिल्ह्यात आणखी नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती होत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसारीत झाले आहे आणि या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
                या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीत सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा समावेश करून नवीन माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे या वृत्तात म्हटले गेले आहे . नवीन २१ जिल्ह्यां बरोबरच माणदेश जिल्हा होत असल्याचा आम्हां माणदेशींना मोठा आनंद होतो आहे . या माणदेश जिल्हा निर्मितीच्या पार्श्वभूमीवर,  शतकापासून उपेक्षित, वंचित, मागास ठेवल्या गेलेल्या आटपाडी तालुक्यातले "आटपाडी शहर " , माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण म्हणून घोषीत झाले पाहिजे . अशी माझ्या सारख्या असंख्य माणदेशींची अंतरीची न्याय मागणी आहे .
                दुष्काळी तालुक्यांचा आटपाडी जिल्हा व्हावा . ही मागणी प्रथमतः आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख यांनी १९७० च्या दशकात एका पाणी परिषदेच्या वेळी केली होती . माणदेशातील अनेक व्यासपीठावरून माणदेश जिल्ह्याच्या मागणीचा वेळोवेळी आवाज उठत आला आहे . १९८९ ते ९३ साला दरम्यान झालेल्या माणदेश ज्ञानपीठच्या दहिवडी, सांगोला येथील साहित्य संमेलनातही या मागणीला पुढे रेटण्यात आले होते . दहिवडीच्या साहित्य संमेलनात, मी ( सादिक खाटीक ) , सुभाष कवडे सर, प्राचार्य सयाजीराजे मोकाशी यांनी, माणदेश जिल्हाची ही मागणी जोरात लावून धरली होती . माझ्या पत्रकारीतेच्या ३६ वर्षाच्या कार्यकाळात, माणदेश जिल्हा व्हावा, माणदेश जिल्ह्याचे ठिकाण आटपाडी असावे, यावर मी सातत्याने लिखाण केले आहे . विविध व्यासपीठ, बैठका, मिटींगामध्ये, माणदेश जिल्हा व्हावा आणि या जिल्ह्याचे ठिकाण आटपाडीच असावे, यावर ठाम मत मी मांडले आहे. याचेही शेकडो जण साक्षीदार आहेत .
                सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ,  सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा आणि सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांचा माणदेशात समावेश होतो . या माणदेशी आठ तालुक्यात सर्वांना सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून आटपाडी शहरच ठरू शकते. यासंदर्भाने भाष्य करताना सादिक खाटीक यांनी अनेक मुद्यांचा परामर्श घेतला आहे .
                माणदेशातल्या या आठ तालुक्यातल्या आटपाडी तालुक्याला मोठा ऐतिहासीक, साहित्यीक, सांस्कृतीक वारसा लाभला आहे . आटपाडी तालुक्याशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध असणारे , महाकवी ग . दि. माडगूळकर, व्यंकटेशतात्या माडगूळकर, शंकरराव खरात, ना . सं . इनामदार, औंध अधिपती बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी, हे पाच मान्यवर साहित्यीक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते . आटपाडी मुख्य महाल असलेल्या आणि आटपाडी तालुका सर्वार्थाने पुढे यावा, यासाठी सदैव आस्था बाळगणाऱ्या, औंध संस्थानचे राजपूत्र बॅरिस्टर आप्पासाहेब पंत प्रतिनिधींनी भारताचे राजदूत म्हणून मोठी देशसेवा बजावली आहे . आटपाडीच्या म . गो . तथा बाबा पाठक यांनी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून मोठे नाव कमावले आहे . तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते लावणी सम्राज्ञी हा पुरस्कार मिळविणाऱ्या सत्यभामाबाई पंढरपूरकर  या मुळच्या आटपाडी तालुक्याच्या बनपुरीच्या . मुंबईतून अनेक वेळा आमदार, खासदार, नामदार झालेले श्री . राम नाईक साहेब हे ही आटपाडीचेच . भारतीय राजकारणात देश स्तरावर चमकलेले आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे प्रा . अरुण कांबळे, त्यांच्या साहित्यीक मातोश्री शांताबाई कांबळे, जत विधानसभा मतदार संघातून दोन वेळा जिंकणारे ॲड . जयंत सोहनी साहेब हे ही आटपाडी तालुक्यातील गोमेवाडीचे . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जतेतून विधानसभा निवडणूक जिंकणारे आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीचे . विधान परिषदेत १२ वर्षे आमदार राहीलेले पुणे स्थित, ग . दि . माडगुळकर आण्णा मुळचे आटपाडी लगतच्या माडगुळ्याचे . राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्तरावर नावाजलेले मराठी भाषेच्या एबीपी माझा या मराठी न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर साहेब हे ही आटपाडीचेच . सातासमुद्रापार नावलौकीक संपादन केलेल्या, सुवर्ण, रौप्य, कास्य पदके मिळविणाऱ्या अनेक गुणवंत, प्रज्ञावंत, किर्तीवंतांची जन्मभूमी, कर्मभूमी, कुळभुमी आटपाडी तालुका आहे. अर्जून पुरस्कार विजेते करगणीचे सचिन सर्जेराव खिलारी, सुवर्ण, रौप्य पदके मिळविणारे तळेवाडीचे संकेत सरगर, काजल सरगर बंधु - भगिनी, अनेक जिल्ह्यातल्या पैलवानांना आटपाडीच्या तालमीतून तयार करणारे, शिवछत्रपती कीडा पुरस्कार प्राप्त वस्ताद पै . नामदेव बडरे, आपल्या ज्ञानदानाने माणदेशातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात गुणवत्तेचा झेंडा फडकावणाऱ्या लोणारी समाज संस्थेचे, आटपाडीतील गुरुकुल माणदेशाचे वैभव ठरू लागले आहे . हे वास्तव भारतातील व भारताबाहेरील करोडो लोकांना माहीत आहे.
                दर तीन वर्षांनी प्रचंड दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या आटपाडी तालुक्याच्या वाट्याला गत शतकात मात्र मोठे दुर्देवच आले आहे . प्रचंड कर्तृत्वसंपन्न, व्यक्तीमत्वांची जननी असणाऱ्या आटपाडी तालुक्याची राजकीय, सामाजीक, शेतीच्या, पिण्याच्या, पाण्याच्या दृष्टीने मोठी होरपळ झाल्याचे, कोणताही माणदेशी आणि आटपाडी लगतचे तीनही जिल्ह्यातील लोक नाकारणार नाहीत .
                दीड शतकापासून आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी येथे असणाऱ्या ३ टी . एम . सी . क्षमतेच्या तलावाचे नाव मात्र शेजारच्या सातारा जिल्हाच्या माण तालुक्यातल्या म्हसवडचे. आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीतल्या या तलावाचे नाव आजही शासन स्तरावर " म्हसवड तलाव " असेच आहे. या तलावाचा कारभार पाहणारे मुख्यालय राजेवाडीपासून १०० कि . मी . अंतरावरील फलटणला. आणि या तलावाचे बहुतांश पाणी जाते, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला, पंढरपूर तालुक्याला. सद्य स्थितीत, या दोन्ही तालुक्यांना सर्व बाजूंनी विविध पाणी योजनातून पाणी मिळत असतानाही राजेवाडीच्या बहुतांश  पाण्यापासून आटपाडी तालुक्यावाशीय वंचितच राहीले आहेत .
                झुक झुक आगीनगाडीच्या अजरामर गीतातून शतकापासून रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या ग . दि . माडगुळकर आण्णांच्या आटपाडी तालुक्याला खऱ्या अर्थाने रेल्वे आणि विमान सेवेची नितांत आवश्यकता आहे . भारताबाहेर अनेक देशात आणि भारतातल्या प्रत्येक शहरात कार्यरत असणाऱ्या हजारो गलाई बांधवाना आटपाडी - खानापूर तालुक्यात सर्वत्र जलद ये - जा करण्यासाठी रेल्वे आणि विमान वाहतुकीची सेवा अति आवश्यक आहे . भारतात सर्वात प्रभावी ठरणाऱ्या पशुधनामध्ये खिलार जनावरांचे निर्मितीस्थान असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील व माणदेशातील खिलार जनावरांची, देशातील शेती आणि दुध - दुभत्यासाठी मोठी मागणी आहे व सर्वत्र नितांत गरज आहे . इतकेच नव्हे तर आटपाडी तालुका व लगतच्या तालुक्यातील शेळ्या - मेंढ्या वर्गातील या लहान जनावरांच्या दुध, मांस, कातड्याची जगभरात मोठी मागणी आहे . आटपाडीत शनिवारी भरणारा शेळ्या, मेंढ्या, बोकडे, बकरे, पाटी, लाव्हरांचा बाजार, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा बाजार म्हणून गणला जातो आहे . राजस्थानच्या जैसेलमेर इतकी उष्णतेची घनता असणाऱ्या आटपाडी तालुक्यात सौर उर्जा प्रकल्पाला प्रचंड वाव आहे . तालुक्यातल्या असंख्य डोंगरांवर पवन उर्जेच्या पवन चक्क्या उभारणीस पोषक स्थिती आहे . हजारो एकरात बांबु लागवड, बाबुं उद्योगावर आधारीत कारखानदारी, डाळींब, द्राक्ष, व इतर फळ फळांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी येथे उत्तमरित्या चालु शकते. देशात सर्वोत्तम ठरेल अशा शेळ्या - मेंढ्या या लहान जनावरांचे मांस परदेशी निर्यात करणारी व्यवस्था सुद्धा आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उभारता येवू शकते . अशीच येथील सर्वकष स्थिती आहे . कापसाचे प्रचंड आगर असणाऱ्या आटपाडी तालुक्यासह, माणदेशात सुत, कापड, निर्मिती व्यवसायाला मोठी संधी आहे . याशिवाय हजारो एकरात साकारू शकणारी बेंगलोर कॉरीडोर सारखी हजारो कोटी रुपये गुंतवणूकीची मोठी औद्योगिक वसाहत उभारण्यात आटपाडी शहरालगत तसेच तालुक्यात अन्यत्र मोठी पोषक स्थिती आहे.
                जगविख्यात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेली आणि १९३७ साली आटपाडीत उभारली गेलेली कैद्यांची स्वतंत्रपूरातली खुली वसाहत ही भारतात नव्हे तर आशीया खंडातली , क्रुर , गुन्हेगार, सैतानाना, पुन्हा माणसात आणणारी, मानवतावादी भूमिका, कृतीतून साकारणारी पहिली वसाहत होती, आणि आजही तिची महती जगभर आहे .
                देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य  क्रांतीकारकांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या आटपाडी तालुक्याने, सदैव माणदेशाच्या केंद्रस्थानी रहात माणदेशाची मोठी सेवा बजावली आहे . लगतच्या तिन्ही जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणारी, आटपाडी येथील, आटपाडी एज्यूकेशन सोसायटी, ही मोठी शिक्षणसंस्था असो , अथवा दोन दशके, तिन्ही जिल्ह्यातल्या उसाचे गाळप करणारा आटपाडीचा माणगंगा साखर कारखाना असो, किंवा आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीचा श्री . सद्गुरू साखर कारखाना असो , अथवा माणदेशात अव्वल ठरलेली आटपाडीची कृषी उत्पन्न बाजार समिती असो , अथवा बाबासाहेब देशमुख दुध संघाचे अनेक युनिट असोत किंवा बाबासाहेब देशमुख बँकेच्या विविध शाखा असोत, या सारख्या आटपाडी तालुक्यातल्या अनेक संस्थांनी इतर माणदेशी तालुक्यांना नेहमीच मोठा आधार दिलेला आहे . श्री . सिध्दनाथांचे पवित्र स्थान म्हणून देशभर ख्यात असणारी खरसुंडी, श्रीराम उर्फ लखमेश्वर देवस्थानची करगणी, श्री . उत्तरेश्वरांची आटपाडी, श्री . शिरळोबाची दिघंची अशा अनेक यात्रांतून, लाखोंना आटपाडी तालुक्यात आणणारी ही पवित्र स्थाने आटपाडी या माणदेश जिल्ह्याच्या ठिकाणाला मोठी चालना देणारी ठरू शकतात . खिलार जनावरांच्या खरसुंडी, करगणी, आटपाडीत भरणाऱ्या प्रचंड मोठ्या चारही यात्राही आटपाडीची आणखी उंची वाढवणाऱ्या ठरताहेत. हे ही लक्षात घेतले गेले पाहीजे .
                पाण्याच्या प्रचंड दुर्भिष्याने आटपाडी तालुक्यातून, मुंबई पोर्ट ट्रस्ट बंदरातील हमालीसाठी, कापड कामगार, सुतगिरणी कामगार म्हणून इचलकरंजी, बार्शी, मुंबई, सुरत, अहमदाबाद, सह देशाला जवळ करणाऱ्या आटपाडी तालुक्यातील कुटुंबांचा आकडाही शेकडोंच्या घरात जावू शकतो. उसतोडी करण्याच्या आणि मेंढपाळीच्या निमित्ताने भटकंती करणारी आणि सधन भागात जावून तेथेच स्थिरावलेली शेकडो कुटुंबेही आटपाडी तालुक्यातील निघतील, आटपाडी तालुक्यातून देशभरात झालेले हे हजारो स्थलांतरीत आटपाडी तालुकावाशीय, " आटपाडी " हे माणदेश जिल्ह्याचे ठिकाण बनल्याने आणि जिल्हा ठिकाणच्या म्हणून होणाऱ्या नवनिर्मितीच्या प्रगतीने, पुन्हा आपल्या दारी अर्थात आटपाडी तालुक्यात परतणार आहेत . यात तीळमात्र शंका नाही .
                क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकरांच्या माणदेशी दुष्काळी सर्व तालुक्यासह अन्य काही अशा एकूण १३ दुष्काळी तालुक्यांच्या शेतीच्या पाण्याच्या लढ्याचे गत ३२ वर्षापासून आटपाडी शहर आणि तालुका हेच मुख्य केंद्र राहीले आहे . या चळवळीच्या २५ हून मोठ्या पाणी परिषदा आटपाडी येथेच संपन्न झाल्या आहेत . या चळवळीच्या, विविध पक्षाच्या, नामदार, आमदार, खासदार, अशा अनेक नेते मंडळीच्या रेट्यातून १९९६ पासून आज अखेर राज्यात सत्तेत असलेल्या वेगवेगळ्या यूती - आघाडी सरकारने टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यासाठी पाण्याची प्रचंड उपलब्धता करून दिली आहे. देशाला दिशा देणारा, समन्यायी पाणी पुरवठ्याचा बंदिस्त पाईप लाईनचा पथदर्शक प्रकल्प राज्यात, सर्वप्रथम आटपाडी तालुक्यातूनच राबविण्यात येत असून तो जवळ जवळ ८० टक्के मार्गी लागला आहे. ही बाब ही आटपाडी या माणदेश जिल्हाच्या ठिकाणाला अधोरेखित करणारी अशीच आहे. आटपाडी शहरातून २ आणि दिघंचीतून आणखी १ राजमार्ग असे ३ राजमार्ग आटपाडी तालुक्यातून गेलेले आहेत . आटपाडी शहराच्या पुर्व - पश्चिम दिशेने २५ - ३० कि .मी . अंतरावरून २ राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. या ३ राजमार्ग, २ राष्ट्रीय महामार्गाचा आटपाडी शहराला मोठा फायदा होणार असल्याने आटपाडी शहर हे माणदेश जिल्ह्याचे ठिकाण करणे अत्यंत न्यायाचे आणि संपूर्ण माणदेशाच्या सोयीचे ठरणार आहे .
                संस्थानात दोन दोन मंत्रीपदे, आमदारकी भुषविणाऱ्या आटपाडी तालुक्यावर स्वातंत्र्यानंतर राजकीयदृष्ट्या मोठा अन्यायच झाला . आटपाडी तालुक्याच्या सरहद्दीवरील तिन्ही जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांना विधानसभा आमदार म्हणून अनेक वेळा संधी मिळाली . लोकसभा, राज्यसभेवर खासदार म्हणून यातल्या अनेक तालुक्यांना बहुमान मिळाला . इतर अनेक मोठ्या सत्तास्थानी हे तालुके विराजमान झाले . मात्र स्वातंत्र्यानंतर आटपाडी तालुक्याची मोठी राजकीय होरपळ केली गेली आहे  . आटपाडी तालुक्याचा ज्या विधानसभा मतदार संघात समावेश होतो अशा विधानसभा मतदारसंघात झालेल्या  आज अखेरच्या १६ निवडणूकात फक्त दोन वेळाच आटपाडी तालुकावाशीय आमदार झाले . लोकसभा, राज्यसभेची खासदारकी असो, राज्य, केंद्रातील नामदारकी असो अथवा अन्य सत्तास्थानातील नामदारकीच्या दर्जाची पदे असोत आटपाडी तालुक्याच्या वाट्याला विधान परिषदेची ३ वर्षाची आमदारकी, जि . प . चे सव्वा वर्षाचे अध्यक्षपद, या उपर फारसे काही हाती लागले नाही, हे प्रचंड राजकीय दुर्देव आहे . हे दुर्देव पुसून काढून, येत्या दशकभरात आटपाडी तालुक्याच्या पर्यायाने माणदेशाच्या सर्वांगीण, चौफेर आणि लक्षवेधी विकासाच्या दृष्टीने माणदेश जिल्ह्याचे मुख्यालय आटपाडी शहराला करणे, हेच आटपाडी तालुक्यावर आजवर झालेल्या प्रचंड राजकीय अन्यायावर योग्य न्याय देणारा क्रांतीकारी निर्णय ठरू शकेल . माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण " आटपाडी शहर " व्हावे . यासाठी  साकडे घातलेल्या, सर्व मान्यवर महोदयांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना . देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तातडीने सुचित करावे . अशी आग्रही अपेक्षाही सादिक खाटीक यांनी केली आहे 

Reactions

Post a Comment

0 Comments