दक्षिण'मधील सिंचनाचा प्रश्न
सोडवून हरितक्रांती करू;काडादी
बसवनगर, मंद्रूप,येळेगाव,अंत्रोळी,वडापूर येथे
गावभेट दौ-यास मोठा प्रतिसाद
मंद्रूप(कटूसत्यवृत्त):-दक्षिण सोलापूर तालुक्यात अद्यापही सिंचनाचा प्रश्न सुटलेला नाही.त्यामुळे बहुतांश शेती कोरडवाहू आहे. तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविणे ही काळाची गरज आहे त्याशिवाय तालुका समृद्ध आणि वैभवशाली होणार नाही. तालुक्यात हरितक्रांती होण्यासाठी आपण वडापूर येथे बॅरेजेस करण्याबरोबरच सीना आणि भीमा या दोन्ही नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवू तसेच तालुक्यात उजनी धरणाचे कालवे शेत शिवारात पोहोचवू अशी ग्वाही अशी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली.
मंगळवारी ,काडादी यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल, मंद्रूप, येळेगाव, अंत्रोळी वडापूर येथे गाव भेट दौरा झाला या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, शेतकरी संघटनेचे शिवानंद दरेकर,युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे,मोतीलाल राठोड, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे, महादेव जम्मा, सिद्धाराम व्हनमाने, अरुण लातूरे, बाळासाहेब बिराजदार, शिवानंद कलशेट्टी, लक्ष्मण झळकी, अनंत म्हेत्रे, अख्तरताज पाटील, सिद्राम हेळकर आदी उपस्थित होते.
काडादी म्हणाले, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने नेहमीच जिल्ह्यात ऊसाला उच्चांकी दर दिला आहे.नेमकी हीच बाब आमदार सुभाष देशमुख यांना खटकली आहे.
सहकारमंत्री असूनही सहकार चळवळीस आणि सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याऐवजी सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद पडला तर येथील ऊस आपल्या खासगी कारखान्यास मिळेल ही भावना ठेवून त्यांनी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा काहीच विकास कामे केली नाहीत. आज मतदारसंघात वीज, रस्ते, पाणी, आरोग्य,शैक्षणिक समस्या कायम आहेत.त्यामुळे येथील जनतेला विविध समस्यांना आजही सामोर जावे लागते.आज महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.कृषी मालाला हमीभाव नाही.त्या त्यामुळे जनतेला आणि शेतकरी म्हणून जगणे मुश्किल झाले आहे. सलग दहा वर्षे मंत्री आणि आमदार असूनही त्यांना तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. वडापूर येथे बॅरेजेस करू अशी केवळ ते घोषणाच करीत आहेत.मात्र, प्रत्यक्षात कृती त्यांच्या हातून होताना दिसत नाही. वडापूर येथे बॅरेजेस सीना आणि भीमा या दोन्ही नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढल्यास पाण्याची साठवणूक क्षमता वाढणार आहे. त्यामुळे तालुक्यात हरित क्रांती होणार आहे. मात्र, ही कामे पूर्ण करणे अपेक्षित असताना आमदार देशमुख हे केवळ सूडाचे आणि व्देषाचे राजकारण करून गावागावात भांडण लावत आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला मतदारराजांनी भरघोस मतांनी विजयी करावेत असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.यावेळी बाळासाहेब शेळके व सुरेश हसापुरे यांचीही भाषणे झाली.
0 Comments