Result मुलांचा की पालकांचा...? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 29, 2024

Result मुलांचा की पालकांचा...?

 Result मुलांचा की पालकांचा...?        


       वाढत्या स्पर्धेच्या युगात जो तो अव्वल येण्यासाठी धावतोय. मुलगा जन्माला येण्यापूर्वीच तो काय होणार, हे ठरवून पालक त्या दिशेने वाटचाल करतात. मुलाला स्वत:ला काय व्हायचे आहे, याचा कधी विचारही ते करीत नाही.

बालपणापासून महागड्या शाळा, शिकवणी लावून आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचे बालपण चिरडण्याचे काम पालकांकडून सर्रास होत आहे,पालकांच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे दिवसेंदिवस मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू लागले आहे. त्यामुळे पालकांनाच समुपदेशनाची गरज असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे आहे.  सध्या आपल्या पाल्यांनी अभियांत्रिकी (इंजीनियरिंग )आणि वैद्यकीय(medical) क्षेत्रातच करिअर करावे, असा कल बहुसंख्य पालकांचा असतो. त्यामुळे मुलांना आवड असूनही अन्य क्षेत्रांतील पर्यायांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक स्थितीवर होण्याची भीती उदभवत आहे.म्हणून मुलांना त्यांच्या आवडीनुसार फुलू द्यायचे असेल तर पालकांच्या समुपदेशनाला पर्याय नाही.

मुलांची आकलनक्षमता, कल लक्षात घेता मुलाला काय आवडते हे पालकांना सुरवातीपासूनच माहीत असते. स्पर्धेच्या युगात मुलांनी मागे राहू नये, म्हणून मुलांना जबरदस्तीने पारंपरिक करिअर निवडण्याकडे पालक भर देतात. मुलांचा शिक्षणातला रस नसेल तरीही जबरदस्ती केली जाते. परिणामी मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही. या पार्श्‍वभूमीवर शाळा, खासगी क्‍लास, छंदवर्ग यात मुलांना अडकवणाऱ्या पालकांनी मुलांच्या आवडीनिवडीचाही विचार करायला हवा.विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने न घेता जबरदस्तीने नावडत्या क्षेत्रात उतरवल्याने लहान वयातच मुले वेगवेगळ्या मानसिक आजारांचा बळी ठरत आहेत. मुलांना घडवण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. मुलांना विविध अभ्यासक्रमांत अडकवण्यापेक्षा त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा गोष्टी शिकवण्याकडे भर देणे, मुलांची निर्णयक्षमता वाढेल, आकलन वाढेल अशा उपक्रमांत त्यांचा सहभाग वाढविणे आवश्‍यक आहे.

 मुलांकडून पालकांच्या वाढत्या अपेक्षांवर चित्रपटातून नेहमी प्रकाश टाकला जातो. तरी पालक यातून काही बोध घेताना दिसत नाही. ‘थ्री इडियट्‌स’, ‘तारें जमीं पर’ या चित्रपटांतून अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यात आले आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आजचे पालक स्वत:च्या मुलाची बुद्धिमत्ता जाणून न घेता दुसऱ्याच्या मुलाशी नेहमी आपल्या मुलाची तुलना करतात. यात महिला अग्रेसर असून, त्या सतत लहान सहान गोष्टींत मुलांना दुसऱ्याच्या मुलाचे उदाहरण देऊन टोमणे मारतात. हा प्रकार सर्वांत धोकादायक असून, यामुळे मुलगा स्वत:चा आत्मविश्‍वास गमावून बसतो.  पहिल्या-दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी वर्गातून बाहेर पडताना त्यांच्यात अभ्यासातून येणाऱ्या तणावाच्या गोष्टी सुरू असतात. या विषयात एवढे मार्क घेतले की बाबा अमूक वस्तू घेऊन देतील, या विषयात चांगले गुण मिळाले नाहीत, तर मला आई रागावेल, आज शाळेचा आणि क्‍लासचा होमवर्क खूप जास्त असून, टेन्शन आले आहे, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होते. यातून आजचा विद्यार्थी किती तणावात आहे हे लक्षात येते; पालकांनी मुलांकडून अपेक्षा नक्‍की ठेवाव्या,परंतु त्याची क्षमता लक्षात घेऊनच.मुलावर घरच्याच प्रेशर असतं ते असायलाच हवं या बद्दल माझं दूमत नाही पण हेच प्रेशर मग ओझं बनू नये तेही तेवढेच महत्वाचं. कारण हे प्रेशर जेव्हा ओझं बनायला लागते, हळूहळू बोचायला लागत त्यातच घरच्यांचे आणि समाजाचे एवढे काय घनिष्ठ संबंध असतात की स्वतःच्या मुला पेक्षा या समाजावर जास्त विश्वास बसायला लागतो आणि मग काही काळानंतर 'प्रतिष्ठा' हा सगळ्यात मोठा प्रश्न वर येऊ लागतो पोटच्या पोरा पेक्षा या उपऱ्या समाजातली 'प्रतिष्ठा' कधी मोठी होऊन जाते समजतच नाही,

आणि याच त्या खोट्या 'प्रतिष्टेमुळे' किती तरी जीव जातात !!

ज्या काळात मुलांना साथ द्यायची त्या काळात मुलांचे आणि पालकांचे खटके उडू लागतात आणि मग हळूहळू त्यांच्यातले संबंध, संवाद ह्यातला दुरावा वाढत जातो आणि मुलं मग एकटी पडू लागतात, खचू लागतात, आधार शोधू लागतात. आणि कुठेच मन हलकं नाही झालं तर मग असे भयानक पर्याय समोर दिसू लागतात.*हा 'समाज' जो नेहमी नाव ठेवत आलाय तो समाज आपल्या जवळच्या माणसांपेक्षा अचानक कसा काय एवढा महत्वाचा बनून जातो कळतही नाही.

 त्यामुळे पालकांनीही आणि विद्यार्थ्यांनीही एक लक्षात घ्यावं की त्यांनी स्पर्धा नक्की करावी पण ती स्पर्धा करायचीच झाली, तर त्यांनी स्वत:शी करावी. वाढत्या स्पर्धेत मुलांना सहभागी करण्याऐवजी त्यांच्यातील वेगळेपण शोधून ते विकसित करण्यावर भर दिला, तर तो नक्‍कीच आयुष्यात यशस्वी होईल.कारण 

“कोणतंही बोर्ड, कोणतीही परीक्षा तुम्हाला तोपर्यंत नापास करु शकत नाही जोवर तुम्ही स्वतःला नापास करत नाही. परीक्षेच्या फुटपट्टीने मोजावे,एवढे तुम्ही किरकोळ नाहीत.लेकराची खरी परीक्षा वेगळीच आहे,तिथले विषय पण एकदम हटके आहेत. तेव्हा त्या परीक्षेची तयारी करा.  शेवटी बिल गेट्स म्हणतात तसे खरी गुणवत्ता कशात  मोजावी कोणत्याच परिमाण नाही. गुणवत्तेची  व्याख्या  करणे आजपर्यंत ना कोणाला जमले आणि ना कोणाला जमेल. शेवट करताना मी बिल गेट्सच्या एका वाक्याने करेल.ते म्हणतात तसं 

“I am not topper in my university but all toppers are my employers"

 आणि म्हणूनच  मार्क्स आणि गुण हे वेगळे विषय हे कायम काळजावर कोरून ठेवा.. .

✒️.... राहुलकुमार चव्हाण.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages