मराठा सेवा संघाच्या लौकीकाला साजेसे महाअधिवेशन परभणीकरांनी पार पाडले
मराठा सेवा संघ, परभणी आयोजित ' मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन ' परभणी येथे पार पाडले. राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरून विविध राज्यातून मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी या अधिवेशनास आपली हजेरी लावली होती. मुंग्यांच्या रांगेप्रमाणे माणसं कार्यक्रम स्थळी येवू लागली आणि *आल्या आल्या प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द होता. तो म्हणजे ' अबब...'* मराठा सेवा संघाच्या अधिवेशन स्थळी म्हणजेच ' राजलक्ष्मी लॉन्स *'येथे पाऊल ठेवल्या ठेवल्या अधिवेशनाच्या भव्यतेची कल्पना प्रत्येकास येऊ लागली.* आयोजकांनी राजलक्ष्मी लॉन्स या स्थळाची निवड करून आपली निवड किती अचूक आणि यथार्थ आहे हेच सिद्ध केले.
मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासूनच आदरणीय खेडेकर साहेबांनी सातत्याने एकच संदेश दिलेला आहे. *तो म्हणजे मराठा समाज जरी संख्येने मोठा असला, व्यापक असला तरी मराठा समाजामध्ये शिस्तीचा आणि नियोजनाचा अभाव आहे.* तेव्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ती शिस्त आणि प्रत्येक बाबीचे अचूक नियोजन करण्याची दृष्टी विकसित व्हावी यासाठी गेल्या ३२ वर्षांपासून 33 कक्षाच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे. *शिस्त आणि अचूक नियोजन कशाला म्हणतात याचा पुरेपूर प्रत्यय परभणीच्या आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांना दिला.* जेवणाचे नियोजन असो, बसण्याचे नियोजन असो, कार्यक्रम वेळेवर सुरू होण्याचे नियोजन असो की सूत्रसंचालनाचे नियोजन असो... कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, धावपळ नाही. खरंतर कोरोनाच्या जगबंदी नंतर उत्साह वर्धक कार्यक्रम घेणे हे आयोजकांसाठी आव्हान होते. *या कार्यक्रमाचे स्वरूप इतके भव्य होते की खरंतर आयोजकांना सुद्धा हा कार्यक्रम कसा पार पाडेल याची चिंता नक्कीच असावी. किंबहुना पहिल्या दिवशी ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतच होती. परंतु उद्घाटकीय सत्र सुरू झालं आणि उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तीचा प्रत्यय प्रत्येकाच्या वागण्यातून हालचालीतून दिसू लागला. आयोजकांना तो कार्यक्रम प्रयत्नपूर्वक पुढे घेऊन जावा लागलाच नाही. उलट एखाद्या मोठ्या प्रवाहाप्रमाणे हा कार्यक्रम आपसूक पुढे पुढे जाऊ लागला आणि तो पुढे जात असताना आलेल्या पाहुण्यांना आणि श्रोत्यांना आपल्या प्रवाहात सामावून घेवून पुढे जाऊ लागला हे कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य होतं.*
या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणवलेली अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जेवणाचे नियोजन. एखादे सत्र संपल्यानंतर ज्यावेळेस जेवणाची सुट्टी होते त्यावेळेस सर्व श्रोते जेवण करण्यासाठी धाव घेतात. गर्दीमुळे सर्वांचे एकाच वेळी जेवण आटोपत नाही. अर्धे लोक जेवत असतात तर अर्धे सभागृहात जावून बसतात. हे आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा संघटनेच्या अधिवेशनामध्ये दिसून आलेले चित्र होतं. जेवायला जा तर सत्र चुकण्याची भीती आणि सत्र ऐकण्यासाठी बसा तर पोटामध्ये भूक. परंतु परभणी येथे हे चित्र पूर्णपणे बदललं गेलं. आणि एक सत्र सुरू झालं की लगेचच दुसरं सत्र सुरू व्हायचं. कारण जेवणाची सोय बराच वेळ चालू असल्याने ज्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रोते जेवायला जाऊ लागले. याचा अर्थ जेवायला गेलेल्या कार्यकर्त्यांचं सत्र हुकलं असं मात्र आयोजकांनी अजिबातच होऊ दिलं नाही. परंतु परभणीकरांनी या कार्यक्रमामध्ये अशी सुविधा केली होती की तुम्ही अगदी बाथरूमला जरी गेले तरी कार्यक्रमा मधला एक शब्द ना शब्द स्पष्टपणे प्रत्येकाच्या कानावर ऐकू येत होता. जेवणाच्या ठिकाणी सुद्धा भले मोठे स्क्रीन लावले असल्याने आपण आहोत त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वैचारिक सत्राचा आस्वाद घेता येत होता. *त्यामूळे पोटाच्या भुकेसोबत राज्यभरातील मान्यवर वक्त्यांची भाषणे ऐकत मेंदूची भूकही भागवता आली.* या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं. ज्या ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी अत्यंत सुस्पष्ट अशा आवाजातील साऊंड सिस्टिमची व्यवस्था केली होती. त्यामुळे दुकानावर खरेदी करणारे ग्राहक आणि दुकानावर विक्री करणारे विक्रेते त्यांना सुद्धा संपूर्णपणे कार्यक्रमाचा आनंदाने आस्वाद घेता आला.
राजलक्ष्मी लॉन्स हे स्थळ खरंतर परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवनारे ठरले. एवढा देखणा, एवढा भव्य आणि एवढा सुसज्ज हॉल आम्ही महाराष्ट्रात कुठेही पाहिला नाही असे बरेच जण आपापसात बोलत होते. अत्यंत उंची आणि श्रीमंती दर्शवणारे हे राजलक्ष्मी लॉन्स खऱ्या अर्थानं राजेशाही आणि लक्ष्मीने युक्त आहे. परभणीबद्दल ' जगात जर्मनी आणि भारतात परभणी ' असं बऱ्याचदा विनोदाने किंवा टिंगटवाळी करण्याच्या उद्देशाने म्हटलं जायचं. परंतु ' जगात जर्मनी आणि भारतात परभणी ' असे का म्हणतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच आपण मराठा सेवा संघाचे हे अधिवेशन याची देही याची डोळा पाहायला हवे होते. जे लोक या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांनी लाईव्ह केलेला कार्यक्रम युट्युब चॅनेल वरून किंवा इतर समाज माध्यमातुन आवर्जून पाहावा
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मराठा सेवा संघ परभणी यांनी मला व्याख्यानासाठी परभणी येथे बोलावले होते. त्यावेळेस विठ्ठल भुसारी सर आणि कांतराव देशमुख काका यांची भेट झाली होती. दोन्ही व्यक्तिमत्व अत्यंत सालस आणि प्रामाणिक आहेत. *त्यातही विठ्ठल भुसारी सर म्हणजे एक मातीतलं व्यक्तिमत्व आहे. इतक्या मोठ्या उंचीचा माणूस परंतु त्यांचे पाय कायम जमिनीवर असतात. पंढरपूरचा विठ्ठल जसा विटेवर ठामपणे उभा आहे अगदी तसेच. आणि हा इतिहास आहे की ज्या वेळेस विठ्ठल कमरेवर हात देऊन ठामपणे विटेवर उभा राहतो, भक्तांच्या पाठीशी उभा राहतो, तेव्हा विठ्ठलाला वारकऱ्यांना बोलवण्याची गरजच पडत नाही. तर वारकऱ्यांचा मेळा आपसूकच या ठामपणे थांबलेल्या विठ्ठलाच्या भोवती गोळा होऊ लागतो. तो विठ्ठलाच्या भोवती पिंगा घालू लागतो, फेर धरून नाचू लागतो. अगदी तसाच ठामपणा आणि स्वभावातील तेवढीच मार्दवता, तेवढाच प्रेमळपणा आपल्या स्वभावामध्ये असणारे माननीय विठ्ठल भुसारे सर आणि त्यांच्या टीमने यांनी ' अधिवेशन परभणी मध्ये घेणारच आणि यशस्वी करून दाखवणारच ' असा ठाम निश्चय केला. या विठ्ठलाचा आणि त्यांच्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचा ठामपणा पाहून परभणीमध्ये परभणीकर वारकऱ्यांचा मेळा या विठ्ठलाभोवती गोळा झाला. आणि या सर्व वारकऱ्यांनी मिळून महाअधिवेशनरुपी आषाढी एकादशीची यात्राच यशस्वी करून दाखवली.* निश्चितपणे या संपूर्ण आयोजनाचे श्रेय, कौतुक विठ्ठल भुसारे सर आणि त्यांची संपूर्ण टीम मराठा सेवा संघ 33 कक्ष त्यासोबतच स्थानिक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यावसायिक, मीडिया अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठा सेवा संघाच्या पाठीशी उभ राहत आम्ही परभणीकर कुठेही कमी नाही हे जे दाखवून दिलं. परभणीकरांच्या या ठामपणाला, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या शिस्तीला, त्यांच्या कल्पकतेला, त्यांच्या नियोजनाला, त्यांच्या अथक परिश्रमाला लाख लाख सलाम.
खरंतर कोरोनामुळे अवघड जग थांबले होते. त्याला मराठा सेवा संघ सुद्धा अपवाद नव्हता. कोणतेही कार्यक्रम नाहीत की कुणाला भेटणे नाही. या दोन वर्षानंतर जो चळवळीच्या कार्यात जो खंड पडला होता त्या नंतर या अधिवेशनामुळे असंख्य मनावरील मरगळ झटकून जावी असा कार्यक्रम घेणे हे आयोजकांसमोर एक आव्हान होते. पण परभणी येथे पार पडलेले महाअधिवेशन पाहून आमच्या मनात एव्हढी ऊर्जा भरलेली आहे की ती ऊर्जा केवळ पुढच्या अधिवेशनापर्यंतच टिकणारी नाही तर मराठा सेवा संघासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावावे अशी जिद्द निर्माण निर्माण करणारे आहे.
_*तेव्हा सेवा संघाच्या तमाम कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे अधिवेशन परभणी येथे घेवून ते यशस्वी केल्याबद्दल प्रा. विठ्ठल भुसारे सर, त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे मराठा सेवा संघाचे केंदिय पदाधिकारी विशेषतः इंजि. घोगरे साहेब, प्रा. अर्जुन तनपुरे, पुरुषोत्तम जाधव, इतर सर्व कक्षाचे पदाधिकारी, राजलक्ष्मी लॉन्सचे संचालक काकडे सर, जिजाऊ ज्ञानतीर्थचे लोहट दाम्पत्य, रुचकर भोजनाची सोय करणारे, या कार्यक्रमाला वेळोवेळी ठळक प्रसिद्धी देणारे पत्रकार बांधव, समस्त परभणीकर, तीनही दिवसात कुठेही खरखर न करणारी अत्यंत सुस्पष्ट आवाज निर्माण करणारी साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देणारे, स्वागत अध्यक्ष कांतराव काका देशमुख या सर्वांना मानाचा मुजरा. लाख लाख धन्यवाद.*_
*Cherry on the cake : या तीन दिवसीय महा अधिवेशनासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व उपस्थितांना प्रेरणा देणारे युगनायक खेडेकर साहेब आणि रेखाताई खेडेकर यांचे सुद्धा खूप खूप आभार.*
*@ डॉ. बालाजी जाधव*
*प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड*
*संपर्क प्रमुख: परभणी*
*मो. ९४२२५२८२९०*
No comments:
Post a Comment