४० वाहनचालक मद्यपान करून वाहन चालविताना पोलिसांनी पकडले
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मद्यपान करून वाहन चालविणे हा गुन्हा असल्याची माहिती असूनही अनेकजण दारू पिऊन वाहन चालवितात. अनेक मद्यपींचा अपघातात मृत्यूही झाला आहे. तरीदेखील त्यांच्याकडून शिस्त पाळली जात नाही. त्यात तब्बल ४० वाहनचालक मद्यपान करून वाहन चालविताना पोलिसांना आढळले. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मुख्य चौकांमध्ये विशेष मोहीम राबविली.दारू पिऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या त्या मद्यपींची वाहने जप्त करण्यात आली आहेत.पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.आता त्यांच्यावर गुन्हा नोंद करून न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. त्यानुसार मद्यपी वाहनचालकांची तपासणी करून त्यांच्यावर खटले भरले जात आहेत. त्या वाहनचालकावर केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला जात आहे. शहरातील बेशिस्त वाहतूक सुधारण्यासाठी नूतन पोलिस आयुक्तांनी कंबर कसली आहे. वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यासंबंधी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे वाहनचालकांनी शिस्तीचे पालन करून दारू पिऊन वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी केले आहे. त्यांनी विनाकारण मोबाईलवर वेळ न घालवता आठ तासांची ड्यूटी प्रभावीपणे करावी, असेही पोलिस आयुक्त हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता चौका-चौकात वाहतूक पोलिस दिसू लागले आहेत.
No comments:
Post a Comment