ई-बाइकमध्ये अधिक क्षमतेची बॅटरी बसवल्याने कारवाई

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इलेक्ट्रिक बाइकच्या बॅटरीची क्षमता परस्पर वाढवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. बॅटरीची क्षमता २५० वॅट असलेल्या ई-बाइकमध्ये परस्पर बदल केल्याने ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात १ २५३ वाहनांची तपासणी केली. यात ३४७ ई-बाइकमध्ये दोष आढळला. २३३ दुचाकी जप्त केल्या. परिवहन विभागाने अनधिकृतरीत्या बदल करणाऱ्या ई-वाहनांवर कारवाईचे आदेश १९ मे रोजी दिले. ३१ मेपर्यंत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांनी ही कारवाई केली. यात १३९ ई-बाइकच्या शोरूमची झाडाझडती घेतली. सोलापुरातील एका शोरूमची तपासणी केली अन् ११ वाहनांची तपासणी करून गाड्या जप्त केल्या. विजापूर रोड, होटगी रोड आणि बाळे येथे गेल्या दोन दिवसांत ही तपासणी केली. ११ गाड्या जप्त केल्या आहेत.
शोरूममधून ११ गाड्या जप्त
कोणतीही इलेक्ट्रिक बाइक घेताना तिचा वेग साधारणपणे २५ किमी असतो. याच्या बॅटरी २५० वॅटच्या असतात. मात्र काही लोकांकडे ५० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्या आढळल्या. गाड्या जर २५ किमी वेगाने धावणाऱ्या असतील तर त्याला उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी किंवा नोंदणी गरजेची नाही. त्यामुळे या गाड्यांचा रोड टॅक्स आणि नोंदणी खर्च असा साधारण १२ हजार रुपयांचा खर्च माफ होतो. जर त्या गाडीचा वेग वाढवला तर या सगळ्या नियमांची रक्कम भरून गाडी रीतसर नोंदणी करून घ्यावी लागते आणि त्याचसाठी आरटीओने सोलापुरात ११ गाड्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत राहुल खंदारे, किरण खंदारे आणि शिवाजी सोनटक्के या मोटार वाहन निरीक्षकांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment