Hot Posts

6/recent/ticker-posts

भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्राधान्य द्यावे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

 भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्राधान्य द्यावे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर




पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):-  आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 10 जुलै 2022 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्याप्रमाणात वारकरी भाविक येत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 4 जुलै तर जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 5 जुलै रोजी आगमन होणार आहे.  त्याचबरोबर अन्य संताच्या पालख्यांचे जिल्हयात आगमन होणार आहे. या कालावधीत संबधित यंत्रणेने सतर्क राहून येणा-या भाविकांना आवश्यक सोयी सुविधां उपलब्ध करुन देण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

आषाढी यात्रा पालखीसोहळा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह अकलूज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव,  प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, उपमुख्याधिकारी ईशाधिन शेळकंदे, तहसिलदार जगदिश निंबाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे घोडके यांच्यासह  संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आषाढी यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत  येणा-या भाविकांना आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा स्वच्छता आदीबाबींचे  योग्य नियोजन करावे. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पाण्याचे टँकर भरण्यासाठी माळशिरस तालुक्यात 43 विहीरी व विंधन विहिरी यांचे अधिग्रहण केले आहे. पालखी मार्गावर एकूण 63 ठिकाणी पाणी भरण्याची सोय केलेली आहे. पालखी मार्गावर पाणी पुरवठा विभागाने  टँकर भरण्याच्या ठिकाणची माहिती पोलीस विभागाला द्यावी जेणेकरुन पाणी भरण्यासाठी जे टँकर जातील त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल, असे त्यांनी सूचित केले.

       तसेच पालखी मार्गाच्या कामाचा आढावा घेवून उड्डाणपूल व पर्यायी रस्त्याची व्यवस्थेबाबत माहिती घेतली. व पालखी मार्गावर कोणतेही अतिक्रमण राहणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी निर्देशित केले.

आरोग्य विभागाने औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करवा, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करावेत. वीज वितरण विभागाने अखंडीत व सुरक्षित वीज पुरवठा करावा. वाहतूक व पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याबाबत नियोजन करावे.  पाटबंधारे विभागने वेळेत कॅनालला पाणी सोडण्याचे नियोजन करावे.  पालखी तळावर, पालखी मार्गावर, मुक्काम ठिकाणी  फिरते शौचालय, तात्पुरती शौचालयाची पुरेसी व्यवस्था करुन ती वेळोवळी स्वच्छ राहतील यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी  अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

     आषाढी वारी च्या अनुषंगाने पालखी मार्गावरील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून कोणत्याही प्रकारच्या सात रोगाचा फैलाव होणार नाही याबाबत आरोग्य यंत्रणा योग्य ती दक्षता घेत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. तर वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा व वारीकाळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी दिली.

      प्रारंभी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पालखी मुक्काम ठिकाणे, रिंगणसोहळे, कारुंडे हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या विश्रांमगृहाशेजारील मोकळ्या जागेत माऊलींच्या सोहळ्याची स्वागताच्या जागेची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना संबधितांना  यावेळी दिल्या.

    यावेळी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी  पालखी मार्ग, रिंगण सोहळा, व मुक्कामाच्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात  आलेल्या व येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. माळशिरस तालुक्यात 21 ठिकाणी कोविड लसीकरण व तपासणी केंद्र, 34 उपचार केंद्र, विलगकिरण कक्षासाठी 175 बेडची व्यवस्था, 18 स्थनपान कक्ष, सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहिते यांनी सांगितले.                     


Reactions

Post a Comment

0 Comments