अर्थव्यवस्था व बेरोजगारीबाबतचे खरे चित्र लपविण्यासाठी भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांना अनावश्यक महत्त्व - महेश तपासे

महागाई आणि बेरोजगारीसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्या केंद्राचे टोचले कान...
मुंबई :- भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांकडे जनतेचे लक्ष वेधून अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण प्रश्नातून केंद्रसरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अशा अनेक अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत राहिल्यास अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे शक्य होणार नाही अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने देशातील बेरोजगारीचा दर वाढत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत व देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला येऊन महागाईने उच्चांक गाठला आहे. सध्या बेरोजगारीचा दर ७.८३ टक्क्यावर पोचला आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे संकट आणि दिवसेंदिवस देशातंर्गत वाढत असलेल्या महागाईमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास विलंब होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत असेही महेश तपासे म्हणाले.
अलीकडेच, देशाची अर्थव्यवस्था सावरायला १२ वर्षे लागतील अशी चिंता आरबीआयने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्यामुळे महेश तपासे यांनी नको ते विषय काढून महागाई व बेरोजगारीकडे दुर्लक्ष करणार्या केंद्रसरकारचे कान टोचले आहेत.
0 Comments