ठाकरे सरकारच्या या अहंकारामुळे महाराष्ट्राची.."; आशिष शेलारांचा हल्लाबोल
मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळातील 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न गाजत आहे. 12 आमदारांच्या निलंबनामुळे भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर मोठी टीका करण्यात येत आहे. त्यातच गुरूवारी विधानसभेत भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. 12 आमदारांच्या निलंबन प्रकरणात ठाकरे सरकारने अहंकारी भूमिका घेतली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र विधीमंडळाची कधी नाही एवढी नाचक्की झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधीमंडळातील आमदारांना निलंबित करण्याचा ठराव अवैध, असंविधानिक आणि अतार्किक असल्याचं आशिष शेलारांनी सांगितलं. विधानसभेतील ठराव खारीज झाल्याने 12 आमदारांना सभागृहात येण्याचे मार्ग खुले झाले आहेत. विधीमंडळाचे अधिकार सर्वोतोपरी अबाधित राहावेत, अशी भाजपची भूमिका आहे, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे. निर्णय देताना न्यायालयाने सभागृहाच्या अधिकारावर कोणतीही मर्यादा आणलेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, निलंबित बारा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करावी आणि विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी करून निर्णय घ्यावा, असे अंतरिम आदेश दिले होते. सदर 12 आमदारांनी याचिका करूनही सुनावणी केलेली नाही. ठाकरे सरकारच्या या अहंकारामुळे महाराष्ट्राची नाचक्की होत आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलारांनी केली आहे.
No comments:
Post a Comment