Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्व पक्ष तयारीला लागले भाजपमध्ये अद्याप सामसूमच

 सर्व पक्ष तयारीला लागले भाजपमध्ये अद्याप सामसूमच

गतवेळी जिंकलेल्या दोन जागाही टिकवण्याचे कार्यकर्त्यांसमोर आव्हान 


मोहोळ ( कटूसत्य वृत्त):-मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना शहराच्या चहुबाजूने निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. मात्र भाजपमध्ये यावेळी म्हणावा तसा समन्वय जाणवत नाही. काही प्रभागातील उमेदवार आतापासूनच कोणत्या पक्षातून आपणाला संधी मिळते की नवी आघाडी करून त्यामध्ये समाविष्ट व्हावे यासाठी चाचपणी करत असल्याचे जाणवत आहे. गत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या त्यापैकी एका जागेवर म्हणजे 17 क्रमांकाच्या प्रभागात सुवर्णा सुरेश गाढवे तर प्रभाग सोळा मध्ये सुशील नागनाथ क्षीरसागर हे विजयी झाले होते गत निवडणुकीत शिवसेनेला खुले आव्हान देत भाजपने महायुती तोडून स्वबळावर निवडणूक लढवली होती त्यावेळी तत्कालीन भाजपच्या सत्तेतील दिग्गज मंत्र्यांच्या मोहोळमध्ये सभा होऊन देखील केवळ दोन जागा भाजपला मिळाल्या मात्र अन्य प्रभागात काही ठिकाणी भाजप पक्ष समाधानकारक मत मिळवू शकला. सध्या प्रभात सतरा मधील विद्यमान नगरसेविका सुवर्णा गाढवे या राष्ट्रवादी सोबत आहेत त्यांचे पती सुरेश दाजी गाढवे यांचा या प्रभागात मोठा जनसंपर्क आहे सुरेश दाजी गाढवे हे सध्या राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील यांचे नेतृत्व मानतात सुरेश दाजी गाढवे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद देखील भूषवले आहे आता हा प्रभाग खुला झाल्याने या प्रभागातून ते स्वतः राष्ट्रवादीकडून उमेदवारी आणण्याच्या तयारीत आहेत मात्र या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडून मेजर तानाजी माने हेदेखील इच्छुक असल्याचे समजते.

गतवेळी भाजपाकडून विजयी झालेले गाढवे यांना पक्षात ठेवण्यामध्ये संजय अण्णा क्षीरसागर यांना पुरते अपयश आले. नंतरच्या काळात गाढवे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षश्रेष्ठी राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी या प्रभागावर लक्ष केंद्रित करून कोट्यवधी रुपयांचा निधी या प्रभागाला दिला त्यामुळे या प्रभागाचा चेहरामोहरा राष्ट्रवादीने बदलल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे आता या प्रभागातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी या प्रभागातील राष्ट्रवादीने आपली ताकद पणाला लावल्याचे जाणवत आहे. सध्या हा प्रभात केवळ नावापुरताच भाजपच्या ताब्यात असल्याचे जाणवत आहे. या प्रभागातून भाजपा कडून कोणाला उमेदवारी द्यायची याचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना जरी असले तरी या निर्णय प्रक्रियेमध्ये क्षीरसागर परिवाराची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पक्ष आणि कार्यकर्ते दोन्हीकडे समन्वय असणाऱ्या उमेदवाराला भाजपाचे तिकीट मिळणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
प्रभाग 16 चे नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी सुभाष बापू देशमुख यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत प्रभागाचा चेहरामोहरा बदलला. मात्र भाजप सत्तेत असताना देखील या प्रभागातील मतदारांसाठी  देखील भाजपाच्या सत्ता कालावधीत किमान या प्रभागातील भाजप मतदारासाठी तर काही प्रमाणात नीधी देणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने प्रभागातील जनता भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.त्यामुळे आता या प्रभागातील नाराजी भाजप पक्षश्रेष्ठी कशी काढणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे मात्र या प्रभागातून राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार देऊन हा प्रभाग खेचून घेऊ शकते.
चौकट
गत निवडणुकीला संपूर्ण शहरात पॅनल लढवलेल्या भाजपला केवळ दोनच प्रभागात गुंतवून ठेवून संपूर्ण शहरात आपली ताकद निर्माण करण्याचा राष्ट्रवादी व सेनेचा डाव आहे. गत निवडणुकीवेळी भाजपला अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपचे दिग्गज पदाधिकारी यांना देखील या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे या निवडणुकीत स्वबळावर पॅनल निर्मिती करण्यापेक्षा इतर पक्षातील बंडखोरांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करून पक्षाची ताकद मोठी भासवण्याचा आडाखा चाणाक्ष भाजप नेते बांधत असल्याचे चर्चा आहे. मोहोळ शहरातील भाजप आणि ग्रामीण भागातील भाजप यांच्या समन्वयाअभावी या नगर परिषद निवडणुकीत सर्व पक्षीयांना आव्हान कसे द्यायचे हा मोठा जटिल प्रश्न जिल्हा भाजप श्रेष्ठीं समोर आहे. तर काही दिग्गज म्हणवून घेणाऱ्या भाजप नेत्यांना पॅनल निर्मितीपेक्षा स्वतः कोणत्या सुरक्षित प्रभागात निवडणूक लढवून नगरपरिषद जाऊ शकतो याची काळजी लागल्याने आघाडी निर्मितीच्या तयारीत ते सर्वात पुढे असल्याचे जाणवत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments