आम्ही फडणवीसांना टरबुज्या म्हणत नाही ,
चंपा म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी राग मानू नये : जयंत पाटील
पुणे (क.वृ.) : - राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पुणे पदवीधर निवडणूक प्रचारासाठी आले असता, जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, कोरोनाचं संकट, भाजपची भूमिका अशा विविध विषयावर भाष्य केलं. पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंद झाली आहे. त्यासंदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत. मतदार याद्या उशिरा जाहीर झाल्या. दुबार नावे, एकच मोबाईल नंबर, पत्ते चुकीचे अशा त्रुटी आहेत. प्रचारयंत्रणा पोहोचू नये यासाठी कुणीतरी केले आहे. निवडणूक आयोगाकडून त्याबाबत चौकशी व्हावी, असं जयंत पाटील म्हणाले.
भाजपचं वीजबिल आंदोलन
67 हजार कोटींची थकबाकी आहे. असलेल्या अवस्थेला दुरुस्तीचं काम करणार आहोत. व्यवस्था टिकणे महत्वाचे आहे. आम्ही मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आहोत. मागच्या सरकारने काम केलं असतं तर ही वेळ आली नसती, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
चंद्रकांतदादांवर भाष्य
देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये, असा टिपणी जयंत पाटलांनी केली.
पहाटे शपथविधी आणि राज्यपाल
यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं. ते म्हणाले, 'राज्यपाल सुद्धा आता पहाटे काही करत नसतील. राजकारणात अशा गोष्टी चालतात. कटू आठवणी नको आता'.
लॉकडाऊन हा परवडणारा पर्याय नाही
कोरोनाचं वाढतं संकट पाहता, लॉकडाऊन हा परवडणारा पर्याय नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. सामान्य माणसांच्या आरोग्याचा विचार करायची गरज आहे. त्यामुळे सरकार याबाबत लवकरच विचार करेल, असं त्यांनी नमूद केलं.
सततच्या लॉकडाऊनमुळे सरकारवर आर्थिक बोजा, दिवाळीची गर्दी वाढली म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एकत्रित लोकं भेटल्यावर कोरोना वाढतो, हा आमचा अनुभव आहे. कोरोनाच्या काळात भाजपने जेवढी संधी मिळेल तेवढे राजकरण केलं, यावरून एक बेजबाबदार विरोधी पक्ष आम्हाला दिसला, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.
प्रवीण दरेकरांना टोला
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदवीधर निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला. यावर जयंत पाटील म्हणाले, 'बरं झालं पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल असं दरेकर बोलले, निवडणुकीच्या आधी बोलले नाहीत. मात्र राज्याला आता भाजप सरकारची गरज नाही.'
0 Comments