जनधन खात्यातील रक्कम
परत जाणार नाही- सोनवणे
पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन
सोलापूर दि. 9 : केंद्र सरकारने अनुदानरूपी जनधन खात्यात जमा केलेले 500 रुपये कोणत्याही परिस्थितीमध्ये परत जाणार नाही याची महिला ग्राहकांनी नोंद घ्यावी आणि रक्कम काढण्यासाठी विनाकारण बॅंकेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी आज केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ग्राहकांनी अति महत्वाच्या कामासाठी पैशांची निकड असेल तरच शाखेमध्ये येण्याची तसदी घ्यावी. ज्या ग्राहकांकडे एटीएम कार्ड उपलब्ध आहे, अशा ग्राहकांनी एटीएम केंद्रावरून पैसे काढावेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार इतर बॅंकांच्या एटीएम केंद्रावरून पैसे काढण्याची मर्यादा ही सदर संचारबंदीच्या काळासाठी शिथील करण्यात आली आहे, म्हणून ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
केंद्र सरकारने नुकतेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामध्ये समाजातील गरीब जनतेला आर्थिक मदत म्हणून जनधन योजनेत खाते असणा-या महिलांच्या खात्यांमध्ये 500 रुपये प्रति महिना अनुदानरूपी जमा करण्याचे जाहीर केले आहे. सदर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी महिला ग्राहकांची झुंबड सर्व बॅंकांच्या शाखांसमोर दिसून येत आहे. बॅंकांसमोर ग्राहकांना अनुदान देण्यासोबतच, शासकीय/निमशासकीय, खाजगी कर्मचा-यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्याचे सुद्धा आव्हान आहे. सेवा देण्यासाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या शाखेच्या कामकाजाची वेळ राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या सूचनेनुसार नियमित वेळेनुसार राहील. तरी अत्यंत निकडीच्या गरजेशिवाय बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे.
0 Comments