जिल्हा नियोजन कार्यालय होणार पेपरलेस;आय-पास प्रणालीचा वापर करणार : जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे
सोलापूर, दि. 29- जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्हा नियोजन कार्यालयातील कामकाज कागदरहित (पेपरलेस) होणार आहे.
नियोजन विभागाचे कामकाज एक एप्रिल २०२० पासून इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन प्रणालीव्दारे केले जाणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व कामे संगणकीर प्रणालीव्दारे होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता आय-पास प्रणालीचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री. दराडे यांनी याबाबत विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
आय- पास संगणकीय यंत्रणा राज्यभरात कार्यान्वित केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड यांचा समावेश प्रणालीत आहे. लोकप्रतिनिधी आणि कार्यान्वित यंत्रणा इंटरनेटव्दारे जोडल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील कामकाज सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी यांना आपल्या प्रस्तावाबाबत काय परिस्थिती आहे, निधी आला किंवा नाही, प्रस्ताव मंजूर झाला किंवा नाही दिसणार आहे, असेही श्री. दराडे यांनी सांगितले.
0 Comments