सांगोला नगरपरिषदेचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम
‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत वृक्षारोपण; पर्यावरणपूरक व हरित शहर निर्मितीला प्राधान्य
सांगोला (कटूसत्य वृत्त): पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रात वाढ, जैवविविधतेचे संरक्षण आणि शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्याच्या उद्देशाने ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत सांगोला नगरपरिषदेच्या वतीने जुना पारे रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी आणि उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली.
वाढते शहरीकरण, तापमानवाढ, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणेही आवश्यक आहे. याच उद्देशाने नगरपरिषदेकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेला तसेच आवश्यक ठिकाणी वृक्षलागवड केली जात आहे.
‘केवळ वृक्षलागवड नव्हे, तर प्रत्येक लावलेले झाड जगविणे’ या संकल्पनेवर नगरपरिषदेने विशेष भर दिला आहे. लागवड केलेल्या रोपांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षण करण्यात येत आहे.
वृक्षांमुळे प्रदूषण कमी होण्यास, तापमान नियंत्रित राहण्यास, हवेची गुणवत्ता सुधारण्यास तसेच जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाला सामाजिक जबाबदारी मानून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यावरणपूरक आणि हरित शहर निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे.
उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यात येत आहे.
स्वच्छ, सुंदर, हिरवेगार सांगोला करण्याचा संकल्प
‘स्वच्छ सांगोला - सुंदर सांगोला - हरित सांगोला’ या संकल्पनेला बळ देत पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषद कटिबद्ध आहे. लोकसहभागातून हा उपक्रम व्यापक चळवळ बनवून सांगोला शहर स्वच्छ, सुंदर, हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे.
“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य पर्यावरणीय भेट आहे,” असे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment