भाविकांची तहान भागविण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सज्ज दररोज चार कोटी लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन -मुख्याधिकारी रोकडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

भाविकांची तहान भागविण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सज्ज दररोज चार कोटी लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन -मुख्याधिकारी रोकडे

 भाविकांची तहान भागविण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सज्ज
दररोज चार कोटी लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन -मुख्याधिकारी  रोकडे

 

             पंढरपूर,(कटूसत्य वृत्त):- येत्या 6 जुलै रोजी साजरा होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेचा पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून आलेल्या लाखो भाविकांची तहान भागविण्यासाठी दररोज सुमारे चार कोटी लिटर स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.
               पंढरपूर नगरपरिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रमुख मूलभूत सेवा सुविधा मध्ये पाणी वितरण ही व्यवस्था अतिशय महत्वपूर्ण आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने गतवर्षी वीस लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी आपली हजेरी लावली होती. यंदाही हाच आकडा अपेक्षित धरुन पाणी पुरवठा विभागाने आपले नियोजन केले आहे.
             वारीपूर्वी पाणी साठवण्याच्या टाक्याची स्वच्छता व देखभाल दुरुस्तीची आवश्यक ती कामे पूर्ण केली आहेत. विद्युत मोटारींची आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. अष्टमी ते पौर्णिमा या काळात मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गावर असलेली भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या परिसरात दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. भक्तीसागर, चंद्रभागा वाळवंट, पात्रशेड दर्शनबारी, गोपाळपूर रोड या परिसरात नळाद्वारे चोवीस तास पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. वाखरी येथील पाण्याचा हौद, पालखीतळ पाणी पुरवठा आणि शौचालयासाठी नवमी ते दशमी या कालावधीत चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचे शुद्धीकरण आणि निर्जंतुकीरण करण्यासाठी टी सी एल पावडर, क्लोरिन वायू, पी ए सी पावडर, फेरीक ॲलम आदी औषधांचा आवश्यक साठा करण्यात आला आहे.
              भाविकांचे टँकर भरुन देण्यासाठी मनिषानगर पाणी पुरवठा केंद्र व भक्त सागर येथे स्वतंत्र व्यवस्था केली आहे. याठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याचे मोफत टँकर भरुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारीच्या काळात भाविकांना पिण्याचे व सांडपाण्याची कमतरता भासणार नाही याची पूर्ण दक्षता पंढरपूर नगरपरिषदेने घेतलेली असून पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पाणी पुरवठा विभागाचे पाणी पुरवठा अभियंता राजकुमार काळे, दीपक जाधव, भूषण घोडके, विठ्ठल खिलारे, सतीश क्षीरसागर, विठ्ठल वाघे आदीसह ऐशीहून अधिक कर्मचारी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages