आष्टी तलावात केवळ ५८ टक्के पाणीसाठा, आता संपूर्ण लक्ष माढावर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक अशा "आष्टी" तलावात गेल्या पंधरा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने ५८ टक्के पाणी साठा झाला आहे. मात्र आष्टी तलावातील पाणीसाठा १०० टक्के होण्यासाठीची सर्व भिस्त आता माढा तालुक्यातील काही गावात पडणाऱ्या पावसावर आहे.
आष्टी तलावाची उभारणी व त्यात होणारा पाणीसाठा हा पूर्ण पावसाच्या पाण्यावर आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे एक टीएमसी इतकी आहे. या तलावाच्या माध्यमातून व त्यातून जलवाहिन्या टाकून पापरी, खंडाळी, येवती, आष्टी, आदीसह अन्य गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंत पाणी आणले आहे.
या तलावाच्या पाण्यावर डाळिंब, द्राक्ष, पेरू, सीताफळ, केळी या फळबागासह ऊस, मका अशी पिके शेतकऱ्यांनी केली आहेत. या संपूर्ण पिकांचा विचार केला तर २२ हजार एकर क्षेत्र या तलावातील पाण्याच्या माध्यमातून बागायती झाले आहे.
इंग्रजांच्या काळातील राणी व्हिक्टोरिया हिने या तलावाची निर्मिती केली आहे. मात्र गेल्या पंधरा वीस वर्षा पासून शासनाने भूगर्भातील पाणीसाठा वाढावा यासाठी "पाणी आडवा पाणी जिरवा" ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे ओढे, नाले, बंधारे यांच्या माध्यमातून या तलावात येणारे पाणी जागच्या जागी थांबले. या तलावाच्या पाण्यावर सध्या अकरा गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत.
माढा तालुक्यातील अरण, भेंड, तुळशी यासह अन्य गावात पडणाऱ्या पावसाने ओढ्या नाल्याला पाणी येते व तेच पाणी आष्टी तलावात येते. दररोजच्या पडणाऱ्या पावसाने आष्टी तलाव १०० टक्के होण्यास फारसा वेळ लागणार नाही. मात्र, १०० टक्के ची सर्व भिस्त माढा तालुक्यातील काही गावात पडणाऱ्या पावसावर व निसर्गावर आहे हे तितकेच खरे.
0 Comments