चिंता मिटली; कुरनूर धरण शंभर टक्के भरले
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- कुरनूर धरणाच्या वरील बाजूच्या तुळजापूर तालुका व परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच धरणक्षेत्रात अनेक गावांमध्येही जोरदार पाऊस पडल्याने कुरनूर धरण यंदा शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या तीन दरवाजांतून पाणी सोडण्यात सुरवात झाली आहे. धरण शंभर नटक्के भरल्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे.
बोरी व हरणा नदीच्या संगमावर उभे असलेले कुरनूर धरण गेल्या आठवड्यात ५८ टक्के इतके भरले होते. दरम्यान, धरणाच्या वरच्या बाजूकडील धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग व तुळजापूर भागात मोठा पाऊस रात्री पडला. तसेच कुरनूर, चपळगाव, हन्नूर आदी धरणग्रस्त भागातील अनेक गावांतही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांवाटे मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आले आहे. गेल्या शुक्रवारी सकाळी धरण ८६ टक्के इतके भरले होते. सध्या हे धरण शंभर टक्के भरले आहे.
कुरनूर धरणाची एकूण क्षमता ८२२ दशलक्ष घनफूट इतकी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. सुमारे ४५० क्युसेकने धरणातून बोरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
कुरनूर धरणातून सोडलेले पाणी आठ कोल्हापुरी बंधाऱ्यात जाणार आहे. मात्र, सर्व बंधाऱ्याची दार उघडण्यात आलेली आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठल्याही बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत, घरण भरल्याने अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिका व अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
0 Comments