Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवावे

 शेतकऱ्यांनी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवावे


कृषितज्ज्ञ अरुण देशमुख; ए. आय. तंत्रज्ञान भविष्यातील ऊस शेती यावर चर्चासत्र
श्रीपूर : (कटुसत्य वृत्त):- शेतकऱ्यांनी जगामध्ये नवीन आलेल्या व शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करावा. ऊस उत्पादनामध्ये वाढ करून प्रगती करावी, असे प्रतिपादन कृषितज्ज्ञ नेटाफिमचे तज्ज्ञ अरुण देशमुख यांनी केले.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने व व्ही. एस. आय. पुणे अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दाते मंगल कार्यालय पंढरपूर येथे ए. आय. तंत्रज्ञान भविष्यातील ऊस शेती, या विषयावर कारखाना सभासदांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कृषितज्ज्ञ अरुण देशमुख, शास्त्रज्ञ अनिल मुंडे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ संतोष कारंजे, कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकर मोरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
अरुण देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये चालू हंगामाची परिस्थिती पाहिली असता २१ टक्क्याने गळीत कमी झाला आहे. तसेच २६ टक्क्यांनी साखर उत्पादन कमी झाले आहे. ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये मी अनेक कारखाने पाहिले पण त्यांचे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न दिसत नाहीत. पण पांडुरंग साखर कारखान्यास चांगले नेतृत्व लाभल्याने गेली अनेक वर्षापासून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ऊस उत्पादन वाढवण्यासाठी सभासदांच्या स्पर्धा, नवीन उपक्रम राबवले जात आहेत.
पांडुरंग कारखान्याचे ऊस उत्पादन सरासरी १२३ टक्क्यांपर्यंत गेले आहे, ही मोठी आनंदाची बाब आहे. शेतकरी बांधवांनी जुन्या पद्धतीने शेती करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ठिबक सिंचनाचा वापर करून ऊस उत्पादन घेतले पाहिजे. जगाच्या बाजारपेठेमध्ये शेतीसाठी येऊ घातलेल्या ए आय तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चित आपणास ऊस पिकाला पाणी किती द्यावे. पिकावर रोग होणार असेल तर त्याची अगोदर माहिती मिळते. कोणती फवारणी करावी हे सांगितले जाते, ऊस उत्पादनासाठी कोणती खते वापरावीत याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर ऊस उत्पादन घेण्यापूर्वी रान तयार करत असताना ते कसे तयार करावे, याची तंतोतंत माहिती तंत्रज्ञान तुम्हाला देते. या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांनी ऊस उत्पादन घेतल्यास निश्चितच दहा ते बारा महिन्यांमध्ये ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येईल. तेव्हा शेतकऱ्यांनी शाश्वत शेती करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.
शास्त्रज्ञ संतोष कारंजे, शास्त्रज्ञ अनिल मुंडे यांनीही ए आय तंत्रज्ञानामुळे होणारे फायदे याची माहिती दिली. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी ए. आय. तंत्रज्ञानाबाबतची सखोल अशी माहिती दिली. आभार कैलास खुळे यांनी मानले.
चौकट 1
शेतकरी सभासदांनी आता जुन्या पद्धतीने शेती करण्यापेक्षा नवीन आलेल्या ए. आय. तंत्रज्ञानाचा
शेतीसाठी उपयोग करून ऊस उत्पादन वाढवावे.
-प्रशांतराव परिचारक
चेअरमन

Reactions

Post a Comment

0 Comments