सर्वसामान्यांना आता रिक्षा, टॅक्सीसाठी मोजावे लागणार अधिक भाडे

मुंबई (कटूसत्य वृत्त):-देशात आणि राज्यात महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईमध्ये आता सर्वसामान्य नागरिकांना रिक्षा आणि टॅक्सीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
पेट्रोल डिझेल, किराणा आणि गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्यामुळे नागिरक त्रस्त आहेत. यामध्ये आता राज्य सरकारकडून रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ केल्यास नागरिकांना झटका बसणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य सरकार रिक्षा, टॅक्सी भाडे वाढीबाबत विचाराधीन आहे, असे म्हणाले आहेत. दरम्यान बैठक झाल्यावर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढवावे अशी मागणी संघटनांकडून होत आहे. परंतु यावर अद्याप निर्णय झाला नाही. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे अनिल परब म्हणाले.
रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाल्यास जे नागरिक रिक्षा आणि टॅक्सीनेच नियमित प्रवास करतात त्यांना अधिक भाडे मोजावे लागणार आहे. या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा आर्थिक भार हलका होणार आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
देशात आणि राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. तसेच आता दरात घट करण्यात आली आहे. यानंतर रिक्षा आणि टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सातत्याने संबंधित संघटनांकडून केली जात होती. पेट्रोल-डीझेलसोबत सीएनजीच्या किंमतीतही वाढ होत असल्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सींना तोटा सहन करावा लागत आहे. याचा भार रिक्षा आणि टॅक्सीच्या चालकांवर पडत आहे. यासाठी रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढवावे अशी मागणी करण्यात आली होती. यामुळे राज्य सरकार भाडेवाड करण्याबाबत विचार करत असल्याचे अनिल परब म्हणाले.
No comments:
Post a Comment